Manobodh by Priya Shende Part 99 : मनोबोध भाग 99 -जगी धन्य वाराणसी पुण्यरासी

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 99 – Manobodh by Priya Shende Part 99
जगी धन्य वाराणसी पुण्यरासी
तयेमाजि जाता गती पूर्वजांसी
मुखे रामनामावळी नित्यकाळी
जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी
या श्लोकात वाराणसी म्हणजे काशी- विश्वेश्वराचे क्षेत्रं याचा उल्लेख आला आहे. विश्वेश्वर म्हणजे परत शिवशंकर.
‘काशीस जावे – नित्यं वदावे’. हिंदू शास्त्राप्रमाणे आयुष्यात एकदा तरी काशीला जाऊन यावं. विश्वेश्वराचे दर्शन घ्यावं. गंगा स्नान करावं. असं सांगितले आहे. जेणेकरून आपल्या पूर्वजांना चांगली गती प्राप्त होते असं मानतात. अशी श्रद्धा आहे. गंगा स्नानाने पवित्र होतं असं म्हणतात.
म्हणूनच समर्थ म्हणतात की, “जगी धन्य वाराणसी पुण्यरासी, तयेमाजि जाता गती पूर्वजांसी”. आपण काशी क्षेत्री जाऊन दर्शन घेतलं तर आपल्या पदरात पुण्यं तर पडतच शिवाय पूर्वजांना सद्गती मिळते. विश्वेश्वराच्या दर्शनाने पुण्य संचय होतो, मुक्तीकडे वाटचाल होते.
आणि विश्वेश्वर म्हणजेच शंकर भगवान हे रामनामाचा जप करतात. माता पार्वती देखील श्रद्धेने, आदराने रामनामाचा जप करते. ते दोघेही रामनामाचे महत्त्वं जाणतात. त्यांना त्यांच्या वेदना शमावण्याचा *रामनाम* हाच रामबाण उपाय वाटतो. शंकराच्या मुखी रामनाम आहे म्हणून भगवान शंकर उपदेश करतात की, आपल्याला हितकारक असं रामनामच आहे. तोच मार्ग धरा. असा ते स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहेत. तोच आपण स्वीकारला पाहिजे आणि त्यावर श्रद्धा ठेवून मोक्ष मिळाला पाहिजे. त्यासाठी काशीला जायची गरज नाही बसल्या ठिकाणी आपण त्याचं क्षेत्र अनुभवू शकतो. जमलं तर वाराणसी म्हणजे काशीला जावंच असं सांगितलं जातं. कारण माणसाच्या श्रद्धेनच क्षेत्रांना जास्त महत्त्व येतं.
अंतःकरणात सुप्त असलेलं भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागतं. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट, हेच ते निमित्त. तीर्थयात्रा, व्रत, नेमधर्म ही साधने असून त्याचं साध्य हे परमेश्वर प्राप्तीच आहे. दुर्दैवाने आपण साधनांना घट्ट धरून ठेवतो. त्यामुळे परमेश्वर प्राप्ती बाजूला राहते.
भगवान शंकर ही आपल्याला हिताचं सांगत आहेत की सदा (Manobodh by Priya Shende Part 99) सर्वदा मुखी रामनाम असलं तर मोक्षाचा मार्ग मिळवण्यासाठी वेगळं काशीला येण्याची गरज नाही. मोक्ष तुम्ही घरच्या घरी पण मिळवू शकता. यासाठी फक्तं रामनामावर अतूट श्रद्धा हवी. म्हणून समर्थ शेवटच्या दोन चरणात सांगताहेत की, “मुखे रामनामावळी नित्यकाळी, जिवा हित सांगे सदा चंद्रमााैळी”.
जय जय रघुवीर समर्थ
प्रिया शेंडे
मोबाईल 7020496590