Lonavala : मावळ मतदार संघ काँग्रेसला मिळावा याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करणार – संग्राम मोहोळ
एमपीसी न्यूज : मावळ विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाला मिळावा याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन काँग्रेस आयचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ यांनी दिले. लोणावळा शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीला मोहोळ आले होते.
यावेळी काँग्रेस आयचे प्रदेश प्रतिनिधी दत्तात्रय गवळी, जिल्हा काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज पाटील, खजिनदार महेश ढमढेरे, उपाध्यक्षा अर्चना शहा, जिल्ह्याचे युवक उपाध्यक्ष नगरसेवक निखिल कविश्वर, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, नगरसेविका पुजा गायकवाड, सुधिर शिर्के, संध्या खंडेलवाल, सुर्वणा अकोलकर, संजय घोणे, दत्तात्रय दळवी, बाबुभाई शेख, वसंत भांगरे, जितेंद्र कल्याणजी, रवी सलोजा, सुबोध खंडेलवाल, बक्षी, सिंधुताई कविश्वर हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले सध्या जिल्हा काँग्रेसमध्ये युवा नेतृत्वाची नवी फळी निर्माण होत आहे. आपले विरोधक तुल्यबळ असल्या कारणाने आपल्याला आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन त्यांचा सामना करावा लागणार आहे. मित्र पक्षाविषयी काही बाबींची खंत आम्हाला आहे. पण एकत्र येऊन लढण्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले. महेश ढमढरे, पृथ्वीराज पाटील, अर्चना शहा या जिल्हा पदाधिकारी यांनी देखील आघाडीचा धर्म पाळा असा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला. जिल्हा कमिटीच्या वतीने युवकांचे नेतृत्व करणारे युवक उपाध्यक्ष व नगरसेवक निखिल कविश्वर यांना मावळची विधानसभा मिळावी याकरिता शिफारस केली असल्याचे यावेळी सांगितले.
प्रदेश प्रतिनिधी दत्तात्रय गवळी म्हणाले किती दिवस आपण राष्ट्रवादीची धुणी धुवायची, मावळ मतदार संघ हा काँग्रेसला मिळायलाच हवा. पुणे जिल्ह्यात किमान पाच जागा काँग्रेसला मिळाव्यात तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांना मतदार संघ न सुटल्यास राष्ट्रवादीचे काम करणार नसल्याचे गवळी यांनी सांगितले.
मावळ मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यानंतर येथील पाच इच्छुकांपैकी एकाला तिकिट द्या, आयात उमेदवार लादू नका नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा सूचक इशारा कविश्वर यांनी जिल्हा कमिटीला दिला आहे. तसेच पहिल्या यादीत पुरंदर व जुन्नर मतदार संघ काँग्रेसला दिला नाही तर पुणे जिल्ह्यात काँग्रेस आघाडीचे काम करणार नाही, असा गर्भित इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. मेळाव्याचे सूत्रसंचालन नगरसेविका पूजा गायकवाड यांनी केले तर दत्तात्रय दळवी यांनी आभार मानले.