Mumbai : भारताला किमान दोन वर्ल्ड कप जिंकावे लागतील – रोहित शर्मा
एमपीसी न्यूज – भारताला आगामी तीन पैकी किमान दोन वर्ल्ड कप जिंकावे लागतील तसेच वर्ल्ड कप जिंकणे ही गोष्ट सोपी नाही, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले आहे. सुरेश रैनासोबत इस्टाग्रामवर लाइव्ह चॅट करताना रोहितने आपले मत व्यक्त केले.
दरम्यान, सुरेश रैनाने सुद्धा येणाऱ्या दोन पैकी एक वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. ती एक वेगळी भावना आहे. सात-आठ संघांचा पराभव करून तुम्ही फायनल मॅच जिंकता तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो, असे रोहित शर्मा म्हणाला.
रोहितच्या मते भारतीय संघाकडे मोठी संधी आहे. तीन पैकी एक एकदिवसीय विश्वचषक आणि दोन T-20 विश्वचषक आहेत. त्यामुळे आपल्याला किमान दोन कप जिंकावे लागतील असे तो म्हणाला.
या चर्चेदरम्यान सुरेश रैनाने सुद्धा येणाऱ्या दोन पैकी एक वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. सुरेश रैना मोठ्या कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर आहे. या संभाषणात त्यानेसुद्धा भारतासाठी अजून एक विश्वचषक खेळण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
यापूर्वी झालेल्या 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तरी सुद्धा सेमी फायनलला न्युझीलंड विरूद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते.
आगामी T-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला मोठी संधी असल्याचे मत क्रिडा विश्वातून व्यक्त केले जात आहे.