Mumbai News: दस्तनोंदणीतून चार महिन्यांतच 367 कोटी महसूल, राज्याची अर्थव्यवस्था रुळावर – बाळासाहेब थोरात

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी, महसूलमंत्र्यांचा दावा

एमपीसी न्यूज – कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणारानाही मोठा फायदा झाला आहे. मुद्रांक शुल्कात सरसकट 3 टक्के सवलत दिली गेली. या सवलतीमुळे घर खरेदीस चालना मिळून बांधकाम क्षेत्रालाही संजीवनी मिळाली आणि राज्याच्या तिजोरीतही महसूल जमा झाला. महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 2019 च्या तुलनेत दस्तनोंदणीत 48 टक्के तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, बांधकाम क्षेत्रात आलेली मंदीचे सावट दूर करुन या क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच घर खरेदी करणारे या दोघांचे हित लक्षात घेऊन मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन मरगळलेल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. राज्य सरकारच्या या निर्णयाचे केंद्र सरकारनेही कौतुक केले असून इतर राज्य सरकारांनीही महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करावे, असे आवाहन केले आहे.

डिसेंबर 2019 मध्ये 2 लाख 39 हजार 292 दस्तनोंदणीसह 2 हजार 712 कोटींचा असलेला महसूल डिसेंबर 2020 मध्ये तब्बल 4 लाख 59 हजार 607 दस्त नोंदणी होऊन 4 हजार 314 कोटींचा महसूल प्राप्त झाला, डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल 92 टक्के वाढ तर महसूलात 59 टक्के वाढ झाली आहे.सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 2019 साली 8 लाख 44 हजार 636 दस्त नोंदणी होऊन महसूल 9 हजार 254 कोटी रुपये मिळाला होता. तर 2020 मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात 12 लाख 56 हजार 224 दस्त नोंदणी झाली आणि 9 हजार 622 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत 48 टक्के वाढ तर महसुलात 3.97 टक्के वाढ झाली.

महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला दिलेल्या बुस्टर डोसमुळे या क्षेत्रातील मरगळ जाऊन पुन्हा या क्षेत्रात मोठी उलाढाल झाली आहे.

मुंबई, पुणे या मोठ्या शहरांबरोबरच इतर शहरी भागातही घर खरेदीचे करणाऱ्यांचे स्वप्न या मुळे पूर्ण झाले. विशेषतः मोठ्या शहरात फ्लॅट खेरदीच्या किंमतीमुळे मुद्रांक शुल्क लाखात भरावे लागत होते. त्यात घट केल्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही खिळ बसली होती. महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने तिजोरीत पैसा येणास मदत झाली व ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांचाही फायदा झाला, असे महसूलमंत्री म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.