New Delhi : कोरोना संकटाने स्वयंपूर्ण होण्याचा संदेश दिला – पंतप्रधान मोदी

पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांचा देशभरातील सरपंचाशी संवाद

एमपीसी न्यूज : पंचायती राज दिनानिमित्त व कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचाशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अ‍ॅप लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी स्वामित्व योजनेचीही घोषणा केली आहे. कोरोनामुळे सर्व परिस्थिती बदलली असून जे कार्यक्रम समोरासमोर घेतले जात होते. तेच आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घ्यावे लागत आहेत. आपण आत्मनिर्भर बनले पाहिजे, असा संदेश या कोरोना संकटाने आपल्याला दिला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

आपल्या देशातील गावे मूलभूत गरजा भागविण्यासाठी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत. जिल्हा आणि राज्य आपापल्या स्तरावर स्वयंपूर्ण झालं पाहिजे. अशा प्रकारे संपूर्ण देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे. हे आता अत्यंत आवश्यक झाले आहे. पूर्वी देशातील शंभरहून कमी पंचायत ब्रॉडबँडशी जोडल्या होत्या. मात्र, आता सव्वा लाखांपेक्षा जास्त पंचायतींमध्ये पंचायत ब्रॉडबँड पोहोचविण्यात आले आहे.

सरकारने भारतात मोबाइल बनविण्याची मोहीम सुरू केली आहे. याचाच परिणाम म्हणजे आज कमी किमतीत स्मार्ट फोन गावागावात पोहोचले आहेत. आज इतक्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळेच सर्व शक्य झाले असल्याचे पंतधान मोदी यांनी सांगितले. या संकट काळात गावातील लोकांनी आपली संस्कृती दाखवली आहे. त्यांच्या या गोष्टींचे विद्वानांनी देखील कौतुक केलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचा संदेश तुम्ही सर्वांनी जगाला दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रत्येक खेड्यापाड्यात चांगल्या प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे. भारताने कोरोनाशी चांगला मुकाबला केलाय, अशी जगात चर्चा आहे. कमी साधन सामग्रीमध्ये आणि कठीण काळात तुम्ही सर्वजण खंबीरपणे साथ देत आहात. या वैश्विक महामारीतही भारताने या दोन तीन महिन्यात याचा चांगला सामना केला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

आज संकेतस्थळं सुरू करण्यात आली असून, त्या माध्यमातून गावागावांत माहिती पोहोचवणे आणि गावात मदत करणे वेगवान होणार आहे. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण गावातल्या मालमत्तेचे ड्रोनद्वारे ऑडिट केले जाणार आहे. त्यानंतर स्वामित्वचे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे गावांमध्ये मालमत्तेच्या मालकीवरून जे वाद सुरू आहेत, ते संपुष्टात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.