Pimpri : सरकारने टाटा उद्योग समूहाचा उचित सन्मान करावा – गजानन बाबर
एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने 24 मार्च रोजी लॉकडाऊन करून कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेण्यासाठी पाऊले उचलली. कोरोना विरूद्ध लढण्यासाठी टाटा उद्योग समूह टाटा उद्योग समूहाने 1500 कोटी रुपयांची मदत देऊ केली. त्यामुळे सरकारने त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.
याबाबत बाबर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साथीच्या रोगांचा सामना करीत असताना केंद्राला व राज्य सरकारला उपलब्ध निधीची आवश्यकता असते. आज बहुतांश स्वदेशी कारखाने मदतीचा हात पुढे करीत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा उद्योग समूहाने 1500 कोटी रुपये कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी मदत म्हणून जाहीर केले आहेत. अशा या भारताच्या मातीत जन्मलेल्या व महाराष्ट्रातील उद्योगपतीने डोळ्यात अंजन घालावे असे सामाजिक बांधिलकीचे काम केले आहे. ते काम अविस्मरणीय आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
नागरिकांनी स्वदेशी वाहने वापरण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा तसेच चीनमधील वस्तूंची खरेदी करणे टाळावे. चीनची वाहने किंवा कोणतीही वस्तू नागरिकांनी खरेदी करू नयेत. स्वदेशीचा अवलंब करावा जेणेकरून आपली अर्थव्यवस्थाही बळकट होईल तसेच भारत सरकारने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी गजानन बाबर यांनी केली आहे.