Pimpri news: ‘जनतेची सेवा’ हाच भाजपाचा मूळ विचार – चंद्रकांत पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा सप्ताह
एमपीसी न्यूज – ‘जनतेची सेवा’ हाच भारतीय जनता पार्टीचा मूळ विचार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार पंडित दिनदियाळ उपाध्याय यांनी ‘एकात्म मानववाद’ असे तत्वज्ञान मांडले. भाजपाने कोरोनाच्या काळात 2 कोटी 18 लाख लोकांना ताजे अन्न पोहोचवले आहे. तसेच, 40 लाख कुटुंबांना आपण अन्नधान्याचे पॅकेट वाटप केले आहे. ‘मानवसेवा हीच ईश्वर सेवा’ या भावनेतून भाजपा काम करीत आहे. शेवटच्या रांगेतील माणसाचेही कल्याण झाले पाहिले, असा आमचा हेतू आहे, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह (दि.14 ते 20 सप्टेंबर) आयोजित केला आहे.
त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड भाजपच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप आणि आत्मनिर्भर योजनांतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप कार्यक्रम आज (शनिवारी) घेण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजप शहराध्यक्ष -आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, उपमहापौर तुषार हिंगे, माजी खासदार अमर साबळे, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सरचिटणीस राजू दुर्गे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, महिला आघाडी शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, भाजपा मागासवर्गीय सेलच्या उपाध्यक्षपदी नगरसेविका उषा मुंडे यांची निवड झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, दक्षिण भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबाबत राजेश पिल्ले यांचा गौरव करण्यात आला.
महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या की, तळागाळातील नागरिकांसाठी काम करताना महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष उपक्रम आम्ही घेत आहोत. व्यावसाय अर्थसहाय्य देण्याचा प्रयत्न केले जात आहेत.
पथारीवाल्यांसाठीसुद्धा आम्ही कर्ज उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी संवेदनशीलपणे सवर्सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.