Pimpri : कर्मवीर भाऊराव पाटील यांची मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी
एमपीसी न्यूज – कर्मवीर भाऊराव पाटील यांची मरणोत्तर (Pimpri) भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी. त्यांचा शासकीय महापुरुषांच्या यादीत समावेश करावा अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात.
त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. रयत शिक्षण संस्थेच्या (Pimpri) माध्यमातून मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते.
भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत आज साडेचार लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रयत शिक्षण संस्था आज ही सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर (कृतींचा राजा) ही उपाधी देऊन सन्मानित केले आहे.
पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी.
तसेच भाऊराव पाटील यांचा शासकीय महापुरुषांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.