Pimpri : मुलांना घडविताना राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवण्याची गरज – ॲड. लक्ष्मण रानवडे
एमपीसी न्यूज – ज्या प्रमाणे राजमाता जिजाऊंनी (Pimpri) स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय कठीण काळात घडविले व त्यांच्या मार्फत स्वराज्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धेच्या जीवनात महिलांनी राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुलांना घडविणे व त्यांना उच्च पदावर पोहोचविण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी आज राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आपले विचार मांडताना व्यक्त केले.
संत तुकाराम नगर, पिंपरी येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे जिजाऊ जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.जिजाऊ ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा सुलभा ताई यांनी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष देसाई , राघव होजगे , डॉ. विनोद वाघ, रेखागुळवे , प्रमिला ठोके यांनी मनोगत व्यक्त केले.
ॲड. रानवडे पुढे म्हणाले की, मुघलांच्या विळख्यात (Pimpri) भरडून व होरपळून निघत असलेल्या जनतेचे हाल बघून जिजाऊंनी व शहाजी राजेंनी स्वराज्य निर्मितीचा घाट घातला. आपला चौदा वर्षाचा मुलगा स्वराज्य निर्मितीच्या यज्ञ कुंडात झोकून दिला. त्या अगोदर जिजाऊंनी छत्रपतींना लढाईचे शिक्षण, मुत्सद्देगिरी, लढाईच्या डाव पेचाच्या शिक्षणात स्वतःच्या देखरेखीखाली पूर्ण पारंगत करून घेतले होते.
या कार्यक्रमाचे संयोजन कौसल्या जाधव , वर्षा जगताप , वंदना भांगे, सुरेखा कातोरे , वंदना सिरसागर, रेखा पाटील, रत्ना गोदनकर , दिलीप वाघ , ॲड. सुनील रानवडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले . तर अमुराताई नाडार, गीता साळवी , संध्या भालेराव, माधुरी काळे, सुशीला लांबते, आदिंनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी काम केले. सुरेश इंगळे यांनी आभार व्यक्त केले.