Pune : पर्यावरण वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती होईल- प्रवीण दराडे

एमपीसी न्यूज – आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा एक उत्कृष्ट उपक्रम असून याच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाविषयी चांगली जनजागृती होईल, असे प्रतिपादन पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले.

Pune : कलाकारांनी स्टुडीओमधून बाहेर पडत लोकापर्यंत कला पोहोचवावी- चित्रकार प्रमोद कांबळे

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’  या आळंदी ते पंढरपूर पायीवारीच्या  शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, संचालक आदित्य शिरोडकर, नितीन गोरे, माजी न्यायमूर्ती ह.भ.प. डॉ. मदन महाराज गोसावी, एमआयटी पुणेच्या कार्यकारी संचालक स्वाती चाटे- कराड, ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, म. प्र. नि. मंडळ पुणेचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे आदी उपस्थित होते.

दराडे म्हणाले, बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे काही ठिकाणी दुष्काळ, काही ठिकाणी पूर अशा आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे समाजात पर्यावरणाविषयी जागरुकता आणणे गरजेचे आहे.  राज्यातून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांमध्ये बहुतांश वारकरी शेतकरी असतात. वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश आपण त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्नआहे. पर्यावरणाचे महत्व  त्यांच्यापर्यंत पोहोचून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी राहील आणि पर्यावरण संरक्षणाच्या विचाराला  प्रत्यक्ष कृतीची जोड मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येकाने पर्यावरण पूरक जीवनशैली राबविणे आवश्यक आहे. सण, उत्सव पर्यावरण पूरक साजरे करावेत. मुंबई महापालिकेने यावर्षी गणेश उत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका यांनीही अशा प्रकारचे उपक्रम हाती घेवून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याचा प्रयत्न करावा. एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून खरेदीला जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही दराडे यांनी केले.

कार्यक्रमात ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळ, चंदाबाई तिवाडी आणि शाहीर देवानंद माळी यांनी कीर्तन, लोककला पथक आणि पोवाडा यांच्या माध्यमातून समृद्ध पर्यावरण व व्यसनमुक्तीवर आधारीत सादरीकरण केले.

प्रास्ताविकात डॉ. खांडगे यांनी ‘पर्यावरणाची वाटी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ह.भ.प. डॉ. गोसावी आणि गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी उपक्रमाची संकल्पना

पर्यावरणाचे प्रश्न हे व्यापक असल्याने वारीत सहभागी होणाऱ्या दहा लाख वारकरी मंडळीमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती साठी गेल्या नऊ वर्षापासून ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरु आहे. याद्वारे पर्यावरण संरक्षण व संवर्धनात लोकजागृतीचे पुढचे पाऊल टाकले जात आहे.

वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नवीन साधन समोर आले आहे व ते यशस्वी होत आहे. या पायी वारीत मुक्कामाच्या ठिकाणी लोककला प्रकारांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यात किर्तन, प्रवचन, भारुड, पोवाडा व गणगवळण व बतावणी अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.  या उपक्रमात राज्य शासनाने घेतलेल्या एकल वापराचे प्लास्टिक बंदी बाबत व्यापक जनजागृती, प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करा, विजेची बचत, पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन, वृक्षतोड टाळा आदी संदेश देण्यात येणार आहे.

शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर, कुटुंबातील प्रत्येक सदस्याने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेतीपंप चालवावा, ओला कचरा-सुका कचरा वेगळा करुन त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोककलांच्या माध्यमातून केली जाते. ही संपूर्ण वारी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, दिंडी क्र. ८६ सोबत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मार्गक्रमण करणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.