Pune : महाराष्ट्रात अडकलेले जम्मू-काश्मीरचे 1,027 विद्यार्थी विशेष रेल्वेने रवाना
Pune: 1,027 students from Jammu and Kashmir stranded in Maharashtra have been sent by special train
एमपीसी न्यूज – जम्मू-काश्मीरचे 1,027 विद्यार्थी व नागरिक विशेष रेल्वेने बुधवारी (दि. 20) पुण्यातून रवाना झाले. राज्य शासनाच्या वतीने जम्मू-काश्मीर प्रशासनाशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर येथील नागरिकांना जम्मू-काश्मीरला पाठविण्याची परवानगी मिळाली आहे.
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेल्या जम्मू काश्मीर मधील या विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित प्रशासनाची परवानगी मिळवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तेथील परवानगी मिळाल्यानंतर विशेष रेल्वेने हे नागरिक रवाना करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, अहमदनगर, भिवंडी, रायगड आदी जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांचा यात समावेश होता. सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी या नागरिकांकडून हमीपत्र भरुन घेणे, आरोग्य तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली.
या कामकाजाचे नियोजन उपजिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी नीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील व तहसीलदार विवेक जाधव यांनी केले.
सरहद संस्थेचे संजय नहार यांनी या विद्यार्थी व नागरिकांना मदत करण्याबरोबरच रेल्वेतून जाताना त्यांना फूड पॅकेट व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.