Pune : मोठी बातमी ! इतिसाहासात पहिल्यांदाच आषाढी वारीचा पायी पालखी सोहळा रद्द
Big news! For the first time in history, Ashadi Wari's foot palanquin ceremony was canceled
एमपीसी न्यूज – कोरोनामुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द केला आहे.
मात्र, माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी नेण्यात येणार आहेत. त्या कशा न्यायच्या यावर अजुन निर्णय झालेला नाही. पादुका पंढरपूरात पोहोचवणं ही माझी जबाबदारी असेल, अशी ग्वाही पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीने सहभागी झालेल्या सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पालखी सोहळ्यात महाराष्ट्रातून तब्बल 10 लाख भाविक पाय चालत पंढरपूरला जात असतात.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीमधून आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूमधून महिनाभर आधी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. या वारी परंपरेला शेकडो वर्षांची परंपरा आहे.
वादळ, वारा, उन, पाऊस अशा कशाचीही तमा न बाळगता वारकरी अतिशय आनंदात या सोहळ्यात सहभागी होत असतात. काळाबरोबर चालणारा आणि अतिशय विचारी आणि सर्वसमावेशक अशी प्रतिमा असलेल्या वारकरी समाजाने सध्याचं कोरोनाचं संकट लक्षात घेऊन सरकारला साथ देत हा मोठा निर्णय घेतला आहे.