Pune: बहुजनांमधील जातीवाद घातक – डॉ. श्रीपाल सबनीस
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे ॲड. प्रमोद आडकर, नीता अडसूळे यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्रदान
एमपीसी न्यूज- बहुजनांमध्येही ब्राह्मणी व्यवस्था, ब्राह्मण्यग्रस्तता शिरली आहे. बहुजनांमधील (Pune) जातीवादही घातक आहे. जातीवाद कायम राहिल्यास अभिजन आणि बहुजन यांच्यातील सीमारेषेला अर्थ नाही, असे स्पष्ट मत भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
Pavana Dam update : पावसाचा जोर वाढला; चोवीस तासात 98 मिली मीटर पाऊस
सध्या देशाची लोकशाही एका रंगात बुडविण्याचा प्रयत्न सुरू आहे तो घातक असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि रंगतसंगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि भीम आर्मी एकता मिशनच्या जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य नीता अडसूळे यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार सबनीस यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, संघप्रमुख दादासाहेब सोनवणे, प्रेरणा गायकवाड यांची उपस्थिती होती. अण्णा भाऊ साठे यांच्या 54व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर भाष्य करताना डॉ. सबनीस म्हणाले, सध्याचे राजकीय नायक हे संस्कृतीचे नायक नाहीत. त्यांची भाषाच नव्हे तर त्यांचे राजकारणही गलिच्छ आहे.
अशा परिस्थितीत सांस्कृतिक संवादाची भूमिका महत्त्वाची आहे. महापुरुषांच्या नावे दुकानदारी होता कामा नये. सर्व धर्म जेव्हा कर्मठ होतात तेव्हा ते बिघडतात.
अशा वेळी शुद्ध मानवतावादी विचारांवर अधारित राहून सामान्य जनतेने विवेक सांभाळावा. अण्णा भाऊंची सर्व जातीच्या मानदंडांना, बहुजन-अभिजनांना एकत्र घेऊन चालण्याची भूमिका या काळात गरजेची आहे.
महाराष्ट्र हा फक्त फुले-शाहू-आंबेडकरांचा असे न म्हणता आता त्यात फुले-शाहू-आंबेडकर-साठे-आगरकरांचा महाराष्ट्र आहे, अशी भर घातली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य फक्त समुद्रापलिकडेच पोहोचले नसून त्यांची विचारातून अनेक साहित्यिक निर्माण झाले आहेत.
आजच्या राजकारणाची परिस्थिती पाहता महापुरुषांनी पुन्हा जन्म घेऊन देश-राज्य चालवावे, असे वाटते.
संघर्षाच्या भूमिकेतून भविष्यातील वाटचाल असेल असे नीता अडसूळ यांनी असे नमूद केले. रमेश बागवे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी फक्त ठराविक जाती-धर्मवर्गासाठी साहित्य निर्मिती केली नाही तर त्यांनी उपेक्षित वर्गाच्या समस्या आपल्या साहित्यकृतीतून समाजासमोर आणल्या. दादासाहेब सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी तर प्रास्ताविक दत्ता पोळ यानी केले. मान्यवरांचा सत्कार प्रेरणा गायकवाड यांनी केला. आभार बाबासाहेब जाधव यांनी (Pune) मानले.