Pune : प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध राबवा : अनिल देशमुख
Strict restrictions to prevent corona infection in restricted areas: Anil Deshmukh
एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्यावतीने निश्चित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका व पोलीस विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज, शुक्रवारी दिले.
मंत्री देशमुख पुढे म्हणाले, लॉकडाऊन कालावधीत तसेच लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सोशल मिडीयाचा फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वापर करण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे.
त्यामुळे फेकन्यूज, नागरिकांचे फसवणुकीचे प्रकार इत्यादी बाबी घडतांना दिसून येत आहेत. यावर आळा घालण्यासाठी एका सायबर विषयक तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सायबर गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या लढाईत कोरानाचा संसर्ग होवून मृत्यू पावलेल्या पोलीसांच्या कुटुंबाला सेवानिवृत्त काळापर्यंत शासकीय निवासस्थानात वास्तव्य करता येईल, असा महत्वपूर्ण निर्णय गृह विभागाने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन कालावधीत परप्रांतीय मजूर राज्याबाहेर गेले होते. आता ते परत राज्यात येत आहेत. याबाबत प्रशासनाने सतर्क राहून कार्यवाही करावी, अशा सूचनाही गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राबाहेर देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.
तसेच चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घेण्यात येत आहे. यासाठी महापालिकेला निधी मिळावा, अशी विनंती त्यांनी केली.
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, कोरोना रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाचे आदेश, सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
खासदार गिरीश बापट यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करायला हवे, अशी सूचना केली.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. या केंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध करुन देणे, वैद्यकीय सोयी सुविधा द्यायला हव्यात, असे त्यांनी सांगितले.
खासदार अमोल कोल्हे यांनी मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण, रुग्णांना देण्यात येणारी औषधे, रॅपिड टेस्टिंग टेस्टची सेन्सिटीव्हीटी तपासणे आदी बाबींचा नव्याने अभ्यास होणे गरजेचे आहे, असे सांगितले.
आमदार सिद्धार्थ शिरोळे, शरद रणपिसे, चेतन तुपे, भिमराव तापकीर, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सुनील टिंगरे, सुनील शेळके आदी लोकप्रतिनिधींनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.