Pimpri News: गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णयाला स्थगिती द्या; पालकमंत्र्यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज –  पिंपरी- चिंचवड शहरातील  दैनंदिन 100 किलो ओला कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णयाबाबत नागरिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात. या निर्णयासाठी घाई करण्याची आवश्यकता नाही. 1 नोव्हेंबरपासून ओला कचरा न उचलण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका प्रशासनाला केली. नव्याने निर्माण होणा-या गृहनिर्माण संस्थांना तो निर्णय बंधनकारक करता येईल का याचा विचार करण्याबाबत त्यांनी सूचविले आहे. त्यामुळे सोसायटी धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील प्रथमच आज (शुक्रवारी) पिंपरी पालिकेत आले. आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. विविध प्रश्न समजावून घेतले. पालिकेच्या 1 नोव्हेंबर पासून ओला कचरा स्वीकारणार नाही या भूमिकेला छेद देत तो निर्णय स्थगित करण्याची सूचना केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, माजी सभागृह नेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

Mahalunge : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

पालकमंत्री पाटील म्हणाले, ”मागच्या टर्ममध्ये मी केवळ तीन ते चार महिन्यांसाठी पुण्याचा पालकमंत्री होतो. आता मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो असलो तरी जिल्ह्यातील विषय समजून घेत आहे. पुणे, पीएमपीएमलचा आढावा झाला. आज पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस आयुक्तालय आणि पीएमआरडीएचा आढावा घेत आहे. प्रशासनाला विविध सूचना केल्या. शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा ओला कचरा न उचलण्याच्या निर्णयाबाबत नागरिकांच्या भावना लक्षात घेता घाई करण्याची आवश्यकता नाही. आता त्या विषयाला स्थगिती द्यावी असे सूचविले आहे. नव्याने निर्माण होणा-या गृहनिर्माण संस्थांना ते बंधनकारक करता येईल का याचा विचार करण्याबाबत सांगितले.  शाळांना सर्व सोयी-सुविधा देवू पण विद्यार्थ्यांचा पट वाढला पाहिजे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न समजावून घेतला. शहरातील प्रश्नांसाठी दरमहा एक बैठक घेणार आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ”महापालिकेचे चालू असलेले प्रकल्प, अडचणींची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली. वैद्यकीय, स्वच्छता, वेस्ट टू इनर्जी प्रकल्पाची माहिती घेतली. शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती दिली. शहरातील पाणी प्रश्न जिकरीचा झाला आहे. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाबाबत येणा-या अडचणी सांगितल्या. निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम पूर्ण झाले आहे. तेथून वाढीव पाणी मिळाल्यानंतर समाविष्ट भागाला दिले जाईल. त्यामुळे पवनेचे पाणी शहराच्या इतर भागाला दिले जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.