Mathadi Workers : कामगारांचं ओझं हलकं होणार, भार वाहून नेण्यासाठी वजन मर्यादा 

एमपीसी न्यूज – विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीर स्वास्थ्याला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये यासाठी भार वाहून नेण्यासाठी वजन मर्यादा घालून देण्यात आली आहे. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कामगारांकडून 50 किलो वजनापेक्षा जास्त मालाची हाताळणी करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कामगारांचं ओझं आता हलकं होणार आहे. 

मंत्रालयात सहकार व पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना 50 किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार, सहायक निबंधक, अहमदनगर, शरीफ शेख, सहायक निबंधक सोलापूर माने, एपीएमसीचे संचालक अशोक वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई उपसभापती धनंजय वाडकर, सचिव संदीप देशमुख, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, चंद्रकांत पाटील, माथाडी कामगार युनियनचे खजिनदार गुंगा पाटील, किराणा बाजार दुकाने मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ,व्यापारी राजीव मणियार व कामगार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री पाटील म्हणाले, बाजार समित्यांमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या, शेतमालाची माथाडी कामगारांकडून चढ-उतार करणे आरोग्यांच्या दृष्टीने घातक आहे. माथाडी कामगारांकडून 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांमधून मालाची चढ-उतार होणार नाही या बाबत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे निर्देश पाटील यांनी दिले.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर राज्यातून येणारा माल असतो. त्या संबंधित राज्याला सुद्धा 50 किलोपेक्षा अधिक गोण्या भरू नये अशा सूचना द्याव्यात आणि पणन व कामगार विभागाने राज्यातील सर्व बाजार समित्यांना यासंदर्भात कळवावे. त्याचबरोबर स्थानिक जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबत अधिक जन जागृती करावी, असेही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.