Chinchwad : भक्तिरसाची दिंडी तुकाराम महाराज यांच्या चरणी लीन

एमपीसी न्यूज – ‘जय जय राम-कृष्ण-हरी’चा गजर करीत सुरू झालेली भक्तिरसाची दिंडी ‘ज्ञानीयांच्या राजा’चे आकाशा एवढे दर्शन घडवीत अनुपम सोहळ्यात रसिकांच्या चित्ती रममाण झाली. निमित्त होते ते स्वरसायली प्रस्तुत “तुका आकाशा एवढा” सांगीतिक कार्यक्रमाचे!

स्वरांगण योजनेतील दुसऱ्या पुष्पात रसिकांना ही अनोखी अनुभूती आली. मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या सहकार्याने रविवारी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोहळा रंगला. प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर आणि प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री सायली राजहंस – सांभारे यांनी रचना सादर केल्या. तर प्रसिद्ध अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे निरूपण केले.

  • आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा म्हणजेच भागवतधर्म. संत शिरोमणी “ज्ञानोबांनी” या इमारतीचा पाया रचला तर या मंगल मंदिरावर कळस चढविला तो संतश्रेष्ठ “तुकोबांनी”. सर्वच संतांनी आपल्या रचनांमधून जनसामान्यांपर्यंत अध्यात्माचे विचार मांडले. या संतांच्या मालिकेत सोप्या नामभक्तिचा महिमा पटवून आपल्या अभंग रचनांमधून सुविचार आणि सदाचाराचा प्रसार केला आणि भक्तिमार्गाद्वारे समाजात नवचैतन्य निर्माण केले ते “संत तुकाराम महाराजांनी”. तुकोबांच्या संतत्वाचा जीवनप्रवास स्वरसायली प्रस्तुत “तुका आकाशा एवढा” या संगीतमय कार्यक्रमातून उलगडला.

‘ज्ञानीयांचा राजा गुरू महाराज’, ‘आनंदाचे डोही’, ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘आता कोठे धावे मन’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’, ‘पद्मनाभा नारायणा’, ‘आम्हा घरी धन’, ‘अवघा तो शकुन’, ‘कमोदिनी काय जाणे’, खेळ मांडियेला’, ‘राजस सुकुमार’, ‘जेथे जातो तेथे’, ‘जे का रंजले गांजले’, ‘आम्ही जातो अमुच्या गावा, ‘अणुरणीया थोकडा’ या रचनांमधून संतत्वाचा जीवनप्रवास उलगडला.

  • गायक कलाकारांना मिलींद कुलकर्णी, भरत कामत, अनय गाडगीळ, ओंकार दळवी, आदित्य आपटे यांनी साथसंगत केली. संहिता लेखन दिग्पाल लांजेकर यांचे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.