Dapodi News : शहिदांच्या स्वप्नातील भारताची मोदींकडून राखरांगोळी : सचिन साठे
एमपीसीन्यूज : शहिदांनी स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान हे सदैव प्रेरणादायी असायला हवे. देशासाठी ज्यांनी आपल्या जीवनाची संसाराची राखरांगोळी केली. मात्र, अशा शहिदांच्या स्वप्नातील भारताची मोदींनी राखरांगोळी केली. शेतकरी, कामगार, महिला, युवक सर्व आज रस्त्यावर उतरले आहेत. मुठभर उद्योगपतींना अभिप्रेत असलेले हे सरकार आहे, असा घणाघात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला.
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने शहीद दिनानिमित्त दापोडी येथील शहीद भगतसिंग व शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास सचिन साठे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णुपंत नेवाळे, शाम आगरवाल, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे , महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस बिंदू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, पिंपरी ब्लाॅक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष लक्ष्मण रूपनवर, काँग्रेस सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, युवक काँग्रेस चे सरचिटणीस कुंदन कसबे,चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, गौरव चौधरी, विवेक भाट, अनुसूचित जाती विभाग पिंपरी चिंचवड शहर माजी अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, कार्याध्यक्ष हिरामण खवळे आदी उपस्थित होते.
साठे पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्या ऐवजी निवडणूक प्रचारात मोदी व शहा व्यस्त आहेत. असा भारत पाहताना शहिदांच्या डोळ्यात देखील अश्रु येत असतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपणा सर्वांना शहिदांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन देशाच्या समृद्धीसाठी पुन्हा लढा उभारावा लागणार आहे.