Pune: मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे – सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज

एमपीसी न्यूज – “निराकार प्रभुने आम्हाला हे जे (Pune)मानव जीवन दिले आहे त्याचा प्रत्यक क्षण मानवतेसाठी समर्पित व्हावा, असा परोपकाराचा सुंदर भाव आपल्या हृदयात उत्पन्न होतो तेव्हा खरं तर अवघी मानवता आम्हाला आपली वाटू लागते.” असे उद्गार सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ‘मानव एकता दिवस’ प्रसंगी भाविक भक्तगणांना संबोधित करताना व्यक्त केले.
मानव एकता दिवसाचे पावन पर्व बाबा गुरबचनसिंहजी यांनी मानवतेच्या प्रति केलेल्या महान सेवांसाठी समर्पित असून त्यातून प्रेरणा घेऊन निरंकारी जगतातील प्रत्येक भक्त आपल्या जीवनाचे कल्याण करत आहे.

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आज संपूर्ण भारतवर्षात जवळपास 207 ठिकाणी विशाल रुपात रक्तदान शिबिरांच्या श्रृंखलेचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सुमारे पन्नास हजार युनिट रक्त संकलित करण्यात आले.
  संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम पुणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात समस्त रक्तदात्यांनी स्वेच्छेने व अत्यंत उत्साहाने 794 युनिट रक्तदान केले अशी माहिती पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली. ससून रुग्णालय रक्तपेढी 289 आणि वाय. सी. एम. रुग्णालय रक्तपेढीच्या टीमने 505 युनिट रक्त संकलित केले.

 मानव एकता दिवस प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात जनसमुदायाला संबोधित करताना सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की सेवा ही नेहमी निष्काम भावनेनेच केली जाते. अशी भावना जेव्हा आपल्या हृदयात निवास करते तेव्हा खऱ्या अर्थाने आपले जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित होते. असेच परोपकारी जीवन बाबा गुरबचनसिंहजी यांच्या दिव्य शिकवणूकीचा आधार राहिला आहे.
निष्काम सेवेच्या सुंदर भावनेविषयी बोलताना सदगुरु माताजींनी समजावले, की जेव्हा आमच्या मनामध्ये निष्काम सेवेचा भाव उत्पन्न होऊ लागतो तेव्हा हे जग आणखी सुंदर दिसू लागते. कारण त्यावेळी आमची सेवाभावना साकार व कर्मरूप धारण करुन समस्त मानव परिवारासाठी वरदान बनून जाते. रक्तदान ही मनुष्य जीवन वाचविण्यासाठी केली जाणारी एक अशी सर्वोपरि सेवा आहे ज्यामध्ये परोपकाराची नि:स्वार्थ भावना निहित आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.