Pimpri : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो नागरिकांना सौहार्दपणे वागणूक द्या; तक्रारींचा वेळेत निपटारा करा

महापालिका आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांचे अधिका-यांनी त्वरित निवेदन स्वीकारावे. विहित वेळेत त्यांच्या तक्रारीचा निपटारा करावा. त्यांच्याशी सौजन्याने वागावे. तसेच ओळखपत्र लावावे. महापालिकेचा गणवेश परिधान करावा. टाईमापस करु नये सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत. तक्रारीचा निपटारा करण्यास विलंब करणा-या अधिकारी, कर्मचा-यांबरोबरच विभागप्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय, आठ क्षेत्रीय कार्यालये, दवाखाने, कर संकलन कार्यालये, तसेच इतर विभागांचा मोठा विस्तार आहे. शहरातील सुमारे 22 लाख नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी महापालिका आस्थापनेवर सुमारे साडेसात हजार अधिकार व कर्मचारी आहेत. महापालिकेच्या विभागांमध्ये दररोज हजारो नागरिक कामानिमित्त येत असतात. नागरिकांच्या अर्जावर , निवेदनावर, पत्रावर विहित कालावधीत कारवाई करणे कर्तव्य आहे. तथापि, तांत्रिक विभागामार्फत अर्जावर मुदतीत कार्यवाही केली जात नाही. पत्रव्यवहार केला जात नाही. तोंडी माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. त्याचबरोबर कार्यालयात येणा-या नागरिकांशी अधिकारी, कर्मचारी सौजन्यपूर्ण वागणूक देत नाही. या नागरिकांना संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरत आल्याबाबत आणि जागेवर उपलब्ध नसल्याच्या आयुक्त कार्यालयात लेखी, तोंडी तक्रारी वारंवार प्राप्त होत आहेत. हे कार्यालयीन शिस्तीस धरुन नाही.

महापालिका आयुक्‍तांनी याची दखल घेतली आहे. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी आलेल्या सर्व नागरिकांशी सौजन्यपूर्ण व सौहार्दपूर्ण वागावे. त्यांच्याशी उद्धटपणे वागू नये, असे परिपत्रकच आयुक्तांनी जारी केले आहे. महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी कार्यालयात येणा-या नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. तसेच त्यांना दाखल करावयाचे अर्ज, पत्र विनाविलंब स्वीकारुन त्याबाबतची पोहच तत्काळ देण्यात यावी.

नागरिकांचे अर्ज, पत्र, निवेदन स्वीकारुन पोहोच देताना संबंधित कर्मचा-यांनी दिनांकित स्वाक्षरी करुन संपूर्ण नाव पदनाम लिहावे. अर्जावर वेळेत कार्यवाही करुन लेखी पत्राद्वारे, ई-मेलद्वारे कळविण्यात यावे. उत्तर कळविणे संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांचे कर्तव्य आहे.

नागरिकांच्या कामाचा विहीत मुदतीत निपटारा होईल. कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही. याची दक्षता घ्यावी. कार्यालयात प्रवेश करताना अधिकारी, कर्मचा-यांनी कामावर हजर असताना गणवेश परिधान करावा. विभागाच्या आहरण-वितरण अधिकारी, वरिष्ठ पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी आपल्या आस्थापनेवरील कर्मचा-यांनी ओळखपत्र व विहित केलेला गणवेश परिधान केला आहे की नाही याची दैनंदिन तपासणी करावी. विभागप्रमुखांनी त्यांच्या अधिकारात संबंधिताविरुद्ध नियमाधिन कारवाईन करावी. तपासणीच्या वेळी कर्मचा-यांनी ओळखपत्र लावले नसेल, गणवेश परिधान केला नसल्यास संबंधित कर्मचा-याबरोबरच आहरण-वितरण अधिकारी, वरिष्ठ पर्यवेक्षकीय अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांचे अर्ज, पत्र, निवेदन स्वीकारण्यास विलंब लावणे, पोहच न देणे, अर्जावर विहित मुदतीत उत्तर दिले जात नसल्याबाबत, उत्तर मिळणेकामी वारंवार कार्यालयामध्ये यावे लागत असल्याबाबत, तसेच विभागातील अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरत टाईमपास करत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर विभागप्रमुखांना जबाबदर धरण्यात येणार आहे. त्यांच्यावर नियमाधिन कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.