Article by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय

एमपीसी न्यूज (देवदत्त कशाळीकर) – मागील फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आणि आता त्याच सर्वत्र थैमान सुरु आहे . महापालिकाच नव्हे तर एकूण शासन स्तरावर केवळ एकमेकांची उणी दुणी काढण्यात मग्न पुढारी , चिखलफेकीमध्ये खरा आनंद मानणारे सर्व नेते भंजाळलेल्या अवस्थेतील अधिकारी वर्ग याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहत ऐकत आलो आहोत.

मूळ प्रश्नाचा विचार न करता मलम लावण्याचे दिवस आता संपले आहेत आहे सर्वांनी सोईस्कररित्या विसरण्याचे ढोंग केले आहे . दररोज हजारोंच्या संख्येने लोक पॉझिटिव्ह होत आहेत . प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक इमारतीमध्ये कोविड पॉझिटिव्ह ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .

अशा परिस्थितीमध्ये पालिकेचे सफाई कर्मचारी मात्र प्रचंड मेहनत करताना दिसतात. स्वतः च्या जीवाची बाजी लावून काम करणारे घंटागाडी कर्मचारी असोत कि रस्ता झाडणारे, दररोजच्या त्यांच्या कामात खंड पडलेला नाही. पण त्यांच्या आरोग्याचा महापालिकेला नेहमीप्रमाणे विसर पडला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात दररोज सरासरी 10 हजार टन कचरा गोळा होतो व तो वाहून विल्हेवाट लावण्यासाठी पोहोचवला जातो. या प्रोसेसमध्ये शेकडो कर्मचारी / माणसे अशा कचऱ्याच्या सम्पर्कात येतात. त्यांच्या आरोग्याचे आजवर कुणालाच काही नव्हते पण आता विषय खूप गंभीर आहे.

वॉररूम मधील डॉ. क्रिस्तोफर यांनी दिलेल्या माहितीनुसार आजमितीला शहरात 15 हजार माणसे होम क्वारंटाईन आहेत. जी अर्थातच कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आता प्रश्न असा आहे कि या 15 हजार माणसांच्या घरातील कचरा कुठे जातो? आरोग्य विभागाच्या माहितीनुसार यांचा सर्व कचरा घरोघरी जाऊन गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नेमली आहे . अर्थातच ठेकेदार पण प्रत्यक्षात मात्र केलेल्या सर्वे नुसार अशी कोणत्याही प्रकारची ठेकेदाराची माणसे घरी येऊन कचरा घेऊन गेल्याचे कुणीच सांगत नाही .

शहरातील अनेक पॉझिटिव्ह रुग्णाच्या फोनवर चौकशी करून माहिती घेतली असता असे कोणी ना घरी आले किंवा तसा काही फोन आला असे सांगितले जाते . या प्रकारात सोसायटी ने काय काळजी घ्यावी याची माहिती, मार्गदर्शक तत्त्वे पालिकेकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत . किंवा या होम क्वारंटाईन व्यक्तीच्या घरातील कचरा असा सुरक्षित पद्धतीने वाहून नेता येईल याविषयी माहिती दिली आहे . आजमितीला प्रत्येक सोसायटी मधील कचरा घेऊन जाणारा ठेकेदार वा घंटागाडी कचरा घेऊन जाणारे आरोग्य कर्मचारी यांना हे माहीतच नाहीये कि आपण किती भयानक गोष्टी हाताळत आहोत . सर्वच रामभरोसे सुरु आहे . आज रेमडिसीव्हर पासून बेड पर्यंत, ऑक्सिजन ते व्हेंटिलेटरपर्यन्त रुग्णवाहिका ते शववाहिकेपर्यन्त कोणतीही सुविधा मिळत नाहीये असं असताना आपण अजून किती जोखीम घेणार आहोत हे कळत नाही . मूलभूत नियोजनाचा फज्जा केव्हाच उडालाय पण शहर स्वच्छ ठेवणारे हे स्वच्छता दूत जगताहेत कि मरताहेत याची कुणालाच खंत नाहीये याचेच वाईट वाटते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.