Pune news: मोदीजींच्या संदेशानुसार भाजपासाठी सेवा हेच संघटन, विश्रांतीला परवानगी नाही –  चंद्रकांत पाटील 

एमपीसी न्यूज: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार सेवा हेच संघटन हा भारतीय जनता पार्टीसाठी मंत्र असून त्यानुसार सेवाकार्य करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही विश्रांती घेण्याची परवानगी नसते. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती, हा माझा संकल्प असल्याची विनम्र भावना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील यांच्या ४५ वर्षांच्या समाजिक तथा राजकीय जीवनावर आधारीत चित्रचरीत्र (कॉपीटेबल बुक)चे प्रकाशन मंगळवारी पुण्यात कोथरुड विधानसभा मतदारसंघात संपन्न झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सचिव तथा पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, आ. मुक्ताताई टिळक, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे,  भीमराव आण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे,  दीपक पोटे, दीपक नागपुरे, गणेश घोष, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

चित्रचरीत्राच्या प्रकाशनानंतर बोलाताना मा. पाटील म्हणाले की, “देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांचा ‘सेवा हेच संघटन’ मूलमंत्र घेऊन भाजपाचे सर्व कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे सामाजिक तथा राजकीय जीवनात काम करत असताना, आपल्याला विश्रांती घेण्याची कधीही परवानगी नसते. त्यामुळे कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती! हा संकल्प अंगी बाणवून काम करायचे असते.”

ते पुढे म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मला एकदा प्रश्न विचारला होता की, ‘तू ज्या गावांत राहतोस; त्या गावात कोणीही दु:खी राहिलेलं नाही, अशी स्थिती येण्यासाठी किती वर्षे लागतील?’ त्यावर मी त्यांना नम्रपणे म्हटले होतं की, ‘उत्तर देण्याऐवजी काम करायला सुरुवात करतो!’ त्यानंतर मी माझ्या २२०० लोकसंख्या असलेल्या गावापासून सुरुवात केली.  देवेंद्रजींच्या काळात मंत्री असताना खूप काही करता आलं. त्यानंतरच्या काळातही कोल्हापूर, पुणे किंवा इतर कोणत्याही शहरातून जे काही करत असतो, ती माझी काही योजना म्हणून नाही. तर मा. मोदीजींना दिलेला शब्द आहे. आणि त्यानुसारच मी काम करत असतो. महापालिकेच्या माध्यमातूनही तशी स्थिती आणण्याचा आमाचा प्रयत्न आहे.”

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना मा. पाटील म्हणाले की, “योजना तयार करणे आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करणे हेच आपलं काम असलं पाहिजे. त्यावर निवडणुका सहज जिंकता येतात. कोविडमध्ये तुम्ही जे केले, ते लोक कधीही विसरणार नाही आहेत. त्यामुळे सेवेच्या माध्यमातून कोथरुड विधानसभा मतदारसंघामधून शंभर टक्के सर्व नगरसेवक भाजपाचे निवडून आले पाहिजेत. तसेच महापालिकेतील विजयानंतरही सेवा हा मंत्र मानूनच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे” अशी सूचनाही त्यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.