Chikhali News : कुदळवाडीकरांना ‘आयुष्यमान’ करण्याची जबाबदारी माझी : दिनेश यादव

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना नोंदणीला सुरवात : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

एमपीसीन्यूज : चांगले आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. सध्याची परिस्थिती पाहता दवाखान्याचा खर्च हा सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. यामुळे आरोग्यासह समाजाला आरोग्य विम्याचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे हे तितकेच महत्वाचे आहे. ही जबाबदारी स्वीकारूनच कुदळवाडीमधील नागरिकांना ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत’ अंतर्गत मोफत 5 लाखांचे आरोग्य विमा कवच अभियानाला सुरवात केल्याचे भाजयुमो सरचिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी सांगितले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करता विधायक कामे हाती घ्या, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत यादव यांनी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरूवारपासून (दि.22) कुदळवाडीमधील नागरिकांना या योजनेअंतर्गत विमा कवच देण्याच्या अभियानाला सुरवात केली आहे. भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यादव म्हणाले, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे एक पारदर्शी आणि आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी राज्यासाठी दिलेले आणि देत असलेले योगदान बहुमूल्य आहे. जन्मदिनी अवास्तव खर्च न करता लोकहितवादी आणि विधायक काम करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती आणि गरज ओळखून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना – आयुष्यमान भारत’ अंतर्गत कुदळवाडीमधील नागरिकांसाठी आरोग्य विमा कवच काढून सर्वाना आरोग्य सेवा देण्याचा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यापुढेही सुरूच राहणार आहे.

त्याचबरोबर पाणी हा दैनंदिन जीवनातला महत्वाचा घटक आहे. अशुद्ध पाणी हे अनेक आजारांचे मूळ आहे. तसेच पावसाळा असल्याने अनेकदा गढूळ पाण्याची समस्या निर्माण होते. यामुळे नागरिकांसाठी सवलतीच्या दारात दर्जेदार वॉटर प्युरिफायर उपलब्ध करून देण्याचीही मोहीम हाती घेतली असून त्यासाठीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

… असा घ्या योजनेचा लाभ !

कुदळवाडीतील नागरिकांसाठी विमा योजना अभियान पुढील काही दिवस सुरु राहणार आहे. स्वतःचे आधारकार्ड, पंतप्रधान योजनेचे पत्र किंवा रेशन कार्ड, ज्यांना पत्र मिळाले नाही त्यांनी रेशनकार्ड व आधारकार्ड घेऊन आपले नाव यादीमध्ये तपासून घ्यावे. यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुदळवाडीतील शिवसाई पतसंस्था शेजारी, विठ्ठल – रुख्मिणी मंदिराजवळील कार्यालयात अथवा योजनेच्या अधिक माहितीसाठी काका शेळके ( 9881245572), दीपक घन ( 98909 02805) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.