Chinchwad Bye-Election : भाजपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यात अपयश; वंचितचा आरोप

एमपीसी न्यूज – भाजपने पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न सोडविण्याच्या वेळोवेळी वल्गना केल्या, मात्र केंद्रात नऊ वर्ष ,राज्यात पाच वर्ष आणि आता फुटीर शिवसेनेसोबतचे सरकार तसेच महापालिकेत पाच वर्षे सत्ता या कार्यकालात भाजपला बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न सोडवता आला नाही. (Chinchwad Bye-Election) आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा भाजपचा नेता हा प्रश्नच माहीत नाही व माहिती घ्यावी लागेल असे सांगत असेल तर ते हे शहराचे दुर्दैव असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी केली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ गुरुवारी पिंपरी-चिंचवड मध्ये आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवना बंदिस्त जलवाहिनी बाबत विचारले असता त्यांनी मला याबाबत माहीत नाही माहिती घेतो असे सांगितले.

Pune Crime : धक्कादायक! मोबाईलमुळे 18 वर्षीय तरुणाने स्वत:च्याच आईचा केला खून

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जाधव यांनी म्हटले आहे की, पवना बंदिस्त जलवाहिनीतून पाणी आणण्याचा प्रश्न पिंपरी-चिंचवड मधील 30 लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. महापालिकेने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे ठरविले.(Chinchwad Bye-Election) मात्र, पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात मावळ तालुक्यातील बऊर येथे 2011 मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. रास्ता रोको केला होता. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात कांताबाई ठाकर ,मोरेश्वर साठे व शामराव तुपे या शेतकऱ्यांचा बळी गेला. काही शेतकरी जखमी झाले. तेव्हापासून जलवाहिनीचा प्रश्न प्रलंबित आहे. राष्ट्रवादी व  भाजपला हे प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे.

खोटे बोल पण रेटून बोल या पद्धतीने भाजपचा कारभार सुरू आहे. बंदिस्त जलवाहिनी ,रेडझोन, शास्तीकर यापैकी कोणतेच प्रश्न भाजपला सोडवता आले नाहीत. लोकांचे प्रश्न सोडविणे ऐवजी वेगवेगळ्या प्रकारचे वाद निर्माण करण्यात भाजपला रस आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असताना जॅकवेल प्रकरणात काय घोळ झाला ते जनतेला माहिती आहे. या प्रकरणात तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले गेले. मात्र भाजपने दुसऱ्यावर खापर फोडण्यातच धन्यता मानली. ज्यांना शहराचे प्रश्नच माहीत नाहीत. त्यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने धडा शिकवावा असे आवाहन जाधव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.