Mumbai News : रुग्णसंख्या कमी होत असली तरी नियम पाळण्यात बेफिकिरी नको – मुख्यमंत्री
एमपीसी न्यूज – रुग्णसंख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको अशी सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बुधवारी (दि.23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
‘राज्यात काल 21 सप्टेंबर रोजी सुमारे 36 लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक असून ज्या जिल्ह्यात कमी डोसेस दिले असतील त्यांनी लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवावा,’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.
‘संसर्ग होऊन देखील लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी असते शिवाय मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे हे लक्षात घेऊन लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण करावे. तसेच, रुग्णसंख्या कमी होत असली तरी आरोग्याचे नियम पाळण्यात बेफिकिरी नको,’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून तीन हजाराच्या घरात नवे रूग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत बरे होणा-या रूग्णांची संख्या अधिक असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली आहे, सध्या राज्यात 39 हजार 984 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.