Lonavala :मनशक्ती केंद्राच्या वतीने 150 कुटुंबांना अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वरसोली ग्रामपंचायत परिसरातील अशा दीडशे कुटुंबांना मनशक्ती केंद्राच्या वतीने महिनाभराचा किराणा मोफत देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता 3 लाख रुपयांचा मदतनिधी लोणावळा मंडल अधिकारी ज्ञानेश्वर कारेकर आणि तलाठी साबळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

मावळचे आमदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वरसोली गावच्या सरपंच सारिका खांडेभरड, उपसरपंच दत्तात्रय खांडेभरड, ग्रामसेवक भानवसे, मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, गजानन केळकर, सुहास गुधाटे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुणा शिवाजी खांडेभरड, रजनी राजु कुटे, अरविंद बालगुडे, पोलीस पाटील हिराबाई खांडेभरड, माजी उपसरपंच संजय खांडेभरड, शामभाऊ येवले, माजी उपसरपंच मारुती खांडेभरड, नामदेव पाटेकर, नवनाथ दाभाडे, विलास खांडेभरड, शिवाजी खांडेभरड, संतोष खांडेभरड आदी उपस्थित होते.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संचारबंदी व जमावबंदी करण्यात आल्याने हातावर पोट असणारे सर्वसामान्य नागरिक, कातकरी तसेच आदिवासी समाजातील कुटुंब यांना हाताला काम नसल्याने या संकटाचा सामना करताना मोठी कसरत करावी लागत होती.

मनशक्तीने ह्या कुटुंबांना मदतीचा हात दिल्याने त्यांना दिलासा मिळाला असल्याने सरपंच सारिका खांडेभरड यांनी मनशक्तीचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.