Maharashtra Sand Rate : वाळूचे लिलाव बंद; 600 रुपये प्रति ब्रासप्रमाणे डेपोतून मिळणार वाळू

घराच्या किंमती आवाक्यात येण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – राज्यातील सर्वसामान्यांसाठी ( Maharashtra Sand Rate) स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 5) शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आता 600 रुपये प्रति ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार आहे. यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येतील. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच 600 रुपयात वाळू उपलब्ध होईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री राधकृष्ण विखे- पाटील यांनी राज्यात नवीन वाळू धोरण आणण्याचे निश्चित केले.

याच वाळू धोरणावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. या धोरणानुसार वाळू गटातून वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापनासाठी एक निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर 1 वर्षासाठी संपूर्ण राज्यासाठी 600 रुपये प्रति ब्रास (133 रुपये प्रती टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करुन स्वामित्वधनाची रक्कम माफ करण्यात येणार आहे.

याशिवाय वाळू वाहतुकीचा खर्च नागरिक करतील, अशी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी शासनामार्फत आकारण्यात येणारे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क, इत्यादी खर्च ( Maharashtra Sand Rate) अनिवार्य राहील.

नवीन वाळू धोरणातील महत्त्वाच्या गोष्टी – 

  • राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात वाळू मिळावी तसेच अनधिकृत उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत अपर जिल्हाधिकारी / जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर समिती स्थापन करून वाळू उत्खनन, साठवणूक व डेपो व्यवस्थापन आणि ऑनलाईन प्रणालीव्दारे वाळू डेपोतून वाळू विक्री करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय, खनिकर्म विभाग, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेले आदेश/निर्देश/अटी व शर्ती विचारात घेवून पर्यावरण अनुमती व खाणकाम आराखडा इत्यादीबाबत कार्यवाही करण्यात येईल.
  • यापूर्वी राज्यातील नागरिकांना प्रति ब्रासनुसार वाळू विक्री करण्यात येत होती. त्यामध्ये आता बदल करून, प्रति टनामध्ये वाळू विक्री करण्यात येणार आहे.
  • नदी/खाडीपात्रातील ( Maharashtra Sand Rate) वाळू उत्खनन, वाहतूक, डेपो निर्मीती व व्यवस्थापनासाठी ई-निविदा काढून निविदाधारक निश्चित करण्यात येणार आहे.
  • वाळू डेपोमधून “महाखनिज” अथवा शासन निश्चित करेल त्या ऑनलाईन प्रणालीव्दारे वाळू विक्री करण्यात येईल.
  •  वाळू डेपो निर्मितीसाठी शहराजवळ/गावाजवळ शक्यतो शासकीय जमीन निश्चित केली जाईल. ज्याठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध होणार नाही. तेथे खासगी जमीन भाडे तत्वावर घेण्यात येईल.
  • नदी/खाडी पात्र ते डेपो पर्यंतचे क्षेत्र Geo fencing करण्यात येईल
  • प्रत्येक वाळू डेपोजवळ वाळूचे मोजमाप करण्यासाठी वजनकाटे (वे-ब्रीज) उभारण्यात येतील. सदर ठिकाणी सीसीटीव्ही व काटेरी कुंपण घालण्यात येईल.
  • वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसवणे बंधनकारक करण्यात येईल.
  • प्रथम तीन वर्षासाठी अथवा सदर वाळू गटातील वाळू संपेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्याकालावधीकरीता वाळू उत्खनन, वाहतूक व साठवणूक याबाबतची निविदा काढण्यात येईल.
  • नदी/खडी पात्रातून डेपो पर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना विशिष्ट रंग देण्यात येईल.
  • वाळू डेपोतून नागरिकापर्यंत वाळू पोहोचविण्यासाठी येणारा खर्च नागरिकांना करावा लागेल.

Maval : कोल्हापूर येथील पर्यटक टाटा धरणात बुडाला; अद्याप बेपत्ता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.