Maratha Reservation : केंद्राचं मी बघतो, राज्याने विशेष अधिवेशन बोलवावे – उदयनराजे भोसले
एमपीसी न्यूज – राज्य सरकारने दम असेल तर अधिवेशन बोलवावं. आधी राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो. अशी प्रतिक्रीया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुण्यात बैठक झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार, खासदार एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे. राज्य सरकारने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो. अधिवेशन बोलवून गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर चर्चा करावी. आता जस्टीस भोसले यांचा रिपोर्ट आला आहे. थप्पी गोळा करुन काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालवणार का? काय फालतुगिरी सुरु आहे, असा संताप उदयनराजे यांनी व्यक्त केला.
#मराठा_आरक्षण विषयी छत्रपती उदयनराजेंची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली…@Chh_Udayanraje pic.twitter.com/WaWR4f9M5s
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 14, 2021
आम्ही जात कधी पाहिली नाही, पण आता लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी राज्यकर्ते निर्माण करत आहेत. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. मुद्द्यांवर आधारित राजकारण केलं तर लोक पाठिंबा देतील. असे उदयनराजे म्हणाले. संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं.