Money Laundering: खासगी सावकाराच्या पाशातून शेतकरी सुटणार कधी?
अवैध सावकारी करून गोरगरिबांची कष्टाची कमाई लाटणाऱ्या खाजगी सावकार विजय पाचपुते दाम्पत्यावर कठोर कारवाई करा, पीडित शेतकरी कुटुंबाची पत्रकार परिषदेत मागणी
एमपीसी न्यूज – काही रुपयांची थोड्या कालावधीसाठी गरज असल्याने नाईलाजाने एका सावकाराकडून कर्ज (Money Laundering) घेतलेले कर्ज वेळेत फेडल्यानंतरही सावकाराने कर्ज देताना तारण म्हणून साठेकरार करून घेतलेली जमीन अवैधरित्या स्वतःच्या पत्नीच्या नावावर करण्याचा प्रकार घडला आहे. अनेक गोरगरिबांना मदतीच्या कारणाने विजय पाचपुते आणि नीता पाचपुते या दाम्पत्याने लुटले आहे. अवैध सावकारी करून गोरगरिबांची कष्टाची कमाई लाटणाऱ्या खाजगी सावकार विजय पाचपुते दाम्पत्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी चंद्रकांत चव्हाण व त्यांच्या कन्या अमृता देशमुख यांनी केली आहे. तसेच खाजगी सावकाराच्या पाशातून गोरगरीब जनता आणि शेतकरी कधी सुटणार, असा सवाल देखील या दोन्ही कुटुंबाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक हे देखील उपस्थित होते. पीडित शेतकरी कुटंबास न्याय मिळवून देण्यासाठी आपण लवकरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. ठाकरे सरकारने शेतकरी कुटुंबाला न्याय दिला नाही तर या कुटुंबासह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशाराही नाईक यांनी यावेळी दिला.
देशमुख यांनी पाचपुते यांची रक्कम ठरल्याप्रमाणे व्याजासह वेळेत परत केली. त्यानंतर चंद्रकांत चव्हाण यांची जमीन आणि सह्या करून घेतलेले स्टॅम्प पेपर, चेक परत मागितले. ते देण्यास पाचपुते यांनी टाळाटाळ केली. चव्हाण यांच्या जमिनीचा कुठलाही मोबदला न देता सदर जमीन विजय पाचपुते यांनी कुलमुखत्यारपत्राचा गैरफायदा घेऊन तळेगाव येथे नोंदणी न करता परस्पर स्वतःच्या बायकोच्या म्हणजे नीता पाचपुते यांच्या नावावर केली. त्याचे लोणावळा येथील नोंदणी उपनिबंधकांच्या कार्यालयात खरेदीखत केले.
त्यानंतर देशमुख यांनी दिलेल्या चेकवर रक्कम टाकून पाचपुते यांनी परस्पर बँकेत भरले व बाउन्स करून घेतले. चेक बाऊन्स झाल्याबाबत देशमुख यांच्यावर 138 कलम याप्रमाणे कोर्टात खटले सुरू केले. याची माहिती मिळाल्यानंतर देशमुख यांनी तलाठी कार्यालयात यासंबंधी सविस्तर अर्ज केला. त्यात ‘सदर जमिनीबाबत आम्हाला फसवण्यात आले आहे. जमिनीची कोणतीही रक्कम आम्हाला दिलेली नाही. हा सर्व गैरव्यवहार आहे’, असे तलाठी कार्यालयाच्या निदर्शनास आणून देत सदर जमिनीवर कुठलीही नोंद होऊ नये, यासाठी असलेली वस्तुस्थिती मांडण्यात आली.
भाईचंद हिराचंद रायसोनी ही पतपेढी दिवाळखोरीत असल्याने त्यावर चौकशी सुरू आहे. विजय पाचपुते व नीता पाचपुते यांच्या उत्पन्नापेक्षा खूप अधिक व्यवहार ते उभयता करत आहेत. प्रशासनाने पाचपुते यांच्या घरावर छापा मारला असताना तब्बल 40 मिनिटे नीता पाचपुते यांनी दरवाजा उघडला नाही. या दरम्यान बरेच दस्तऐवज गायब केल्याची आम्हाला माहिती मिळाली, हे पोलिसांना कळवून देखील त्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही.
मनी लॉड्रिंग न्यायालयातही सिद्ध
पाचपुते यांनी चव्हाण व देशमुख यांच्यावर दाखल केलेल्या दोन खटल्यात पाचपुते दाम्पत्याने अवैध सावकारी (Money Laundering) म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग केली असल्याचे कोर्टाने स्पष्टपणे निकालपत्रात लिहिले आहे. त्या निकालाचा आधार घेत चव्हाण आणि देशमुख यांनी अनेक सरकारी खात्यात अर्ज केले.
पाचपुते दाम्पत्य अवैध सावकारी करत असल्याने त्यांची व भाईचंद हिराचंद रायसोनी पतपेढी यांची चौकशी व्हावी, अशा मागणीसाठी सर्व घटनाक्रमासह अनेक सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशन, आयकर विभाग, आर्थिक गुन्हे अन्वेषण, ईडी कार्यालयात दिल्लीपर्यंत अर्ज केले, हेलपाटे मारले, परंतु घोर निराशा पदरी आली. ‘सरकारी अधिकारी व पोलीस माझ्या खिशात आहेत, गुंड माझ्याकडे नोकरीला आहेत’, असे विजय पाचपुते वारंवार बोलत असतो.
सहकार आयुक्त यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज केला असता, उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी त्याची दखल घेतली व 22 जानेवारी 2021 रोजी पाचपुते दाम्पत्याच्या काही मालमत्तांवर छापे टाकले. सुमारे 10 ते 12 तास कारवाई सुरू होती. यात काही कोरे चेक, स्टॅम्प पेपर व अनेक दस्तावेज मिळाले. अनेकांना सावकारी पाशात अडकवल्याचे सिद्ध झाले आहे. उपनिबंधक राठोड व त्यांचे सहकारी यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निस्पृहतेने कर्तव्य पार पाडून आमच्यासाठी आशेचा किरण जागा केला आहे.
पाचपुते दांपत्याने अवैध सावकारी करून गेल्या 12-14 वर्षात अनेक गोरगरिबांना फसवून करोडो रुपयांची मालमत्ता जमवली आहे. पाचपुते कुटुंब परदेशात पळून जाऊ शकते. यासाठी पाचपुते दाम्पत्याला त्वरित अटक करून याची सखोल चौकशी व्हावी, दंडात्मक कारवाई करावी व गोरगरिबांना न्याय मिळावा, अशी मागणी चव्हाण आणि देशमुख कुटुंबीयांनी केली.