Mumbai: 18 दिवसांत 18 लाख शिवभोजन थाळ्या, 33 लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप – छगन भुजबळ

Distribution of 18 lakh Shiva food plates, 33 lakh quintals of food grains in 18 days - Chhagan Bhujbal

एमपीसी न्यूज – राज्यातील 52 हजार 438 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून 1 जून ते 18 जूनपर्यंत राज्यातील 96 लाख 38 हजार 291 शिधापत्रिका धारकांना 33 लाख 80 हजार 90 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच 18 लाख 39 हजार 486 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशन कार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.

या लाभार्थ्यांना 52 हजार 438 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

या योजनेमधून सुमारे 13 लाख 13 हजार 554 क्विंटल गहू, 10 लाख 8 हजार 256 क्विंटल तांदूळ, तर 13 हजार 817 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.

त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या 2 लाख 45 हजार 129 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी दरमहा 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 जूनपासून एकूण 33 लाख 28 हजार 544 शिधापत्रिकांवर मोफत तांदूळ वाटप करण्यात आले.

या श‍िधापत्रिकांवरील 1 कोटी 43 लाख 46 हजार 25 लोकसंख्येला 7 लाख 42 हजार 670 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 76 एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे.

या धान्याचे जून 2020 मध्ये आतापर्यंत 2 लाख 79 हजार 930 क्विंटल वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चना डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 1 लाख 53 हजार 611 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे.

आतापर्यंत 35 हजार 680 क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे. राज्यात 1 जून ते 18 जूनपर्यंत 849 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 18 लाख 39 हजार 486 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच एप्रिल ते जून या कालावधीत 76 लाख 23 हजार 263 शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत आहे.

तसेच काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.