Mumbai News: कोरोना लसीकरण क्रांतीकारक पाऊल – मुख्यमंत्री
'मास्क, हात धुणे आणि सुरक्षित अंतर त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका'
एमपीसी न्यूज – कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे. त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आजचा दिवस क्रांतीकारी आहे. याबद्दल कोणाचेही दुमत नसेल. आजही ते दिवस आठवले तर अंगावर काटा येतो, दिवसरात्र तणाव होता, असेही ते म्हणाले.
मुंबईतील बिकेसी येथील कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊन लसीकरण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.