Pimpri: ‘राष्ट्रवादीला छुपी मदत करण्यासाठीच भाजप नगरसेवकांची पत्रकबाजी, बोलविता धनी जनतेला ठाऊक’

शिवसेना पदाधिका-यांचे भाजपच्या पत्रकबाजीला प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या लोकप्रियतेने भाजपचे नेते हवालदिल झाले आहेत. बारणे यांच्या उमेदवारीच्या विरोधात बोलणा-या नगरसेवकांचा बोलविता धनी जनतेला ठाऊक आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्यासाठी आणि मागील निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेऊन वैयक्तिक स्वार्थापोटी भाजपच्या नेत्यांनी पत्रकबाजी चालवली असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिका-यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपवर केला आहे.

पिंपरी दौ-यावर रविवारी (दि. 10) आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या सात नगरसेवकांनी पत्र देऊन खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीस विरोध असल्याचे सांगितले. बारणे यांच्या पराभवास भाजप कार्यकर्त्यास जबाबदार धरू नये, असेही पत्रकात म्हटले होते. त्याला शिवसेना पदाधिका-यांनी आज (सोमवारी) प्रसिद्धीपत्रकाद्वारे आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. शहरप्रमुख योगेश बाबर, शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, पिंपरी विधानसभा प्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, सरिता साने, अनिता तुतारे, रोमी संधू यांच्या प्रसिध्दीपत्रकार स्वाक्ष-या आहेत.

  • शिवसेना पदाधिका-यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास काम केली आहेत. मतदारसंघात त्यांचा दांडगा लोकसंपर्क आहे. सर्व सामान्य माणसाशी समरस होणारा खासदार अशी त्यांची ख्याती आहे. बारणे यांच्या लोकप्रियतेने हवालदिल झालेल्या भाजप नेत्यानेच नगरसवेकांना ढाल केले आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या नितीन गडकरी यांना भाजप नगरसेवकांनी शिवसेनेची उमेदवारी कोणाला द्यावी, ही विनंती करण्यापेक्षा महापालिकेतील चाललेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार याकडे लक्ष घालण्यास भाग पाडणे आवश्यक होते, असा टोलाही त्यांनी लगाविला आहे.

खासदार श्रीरंग बारणे हेच मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सक्षम उमेदवार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षाचे नेते नेहमीच सरकारच्या चुकीच्या कामांना सरकामध्ये राहून विरोध करीत अंकुश ठेवत आहेत. जनतेच्या भावनांचा आदर करीत राहिले आहे. देशात शिवसेनेचा नाही. तर, भाजपचा पंतप्रधान होण्यासाठी युती हवी, अशी हिंदुत्वादी विचाराच्या मतदारांची, सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास छुपी मदत करण्याचा स्पष्ट हेतू असल्यानेच खासदार बारणे यांच्या विरोधात भाजपने पत्रकबाजी सुरु केली आहे.

  • लोकसभा निवडणुकीत युती होईल किंवा नाही अजूनही स्पष्ट नाही. युती झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना असे दोनच पर्याय मतदारांच्या समोर राहणार आहेत. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेवून वैयक्तिक स्वार्थापोटी ही पत्रकबाजी चालवली आहे. बारणे यांच्या नावाला विरोध करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपवाशी झालेल्यांना युती झाल्यास पुन्हा पूर्वाश्रमीच्या पक्षावर निष्ठा दाखवायची आहे. त्यातूनच अशा प्रकारची पत्रके नेत्यांना देऊन प्रसिद्धी मिळवत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार बारणे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला आहे. युती होवो अथवा न हो 2019 च्या निवडणुकीत बारणे हेच शिवसेनेचे खासदार असणार आहेत, असे शिवसेना पदाधिका-यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.