PM Modi Pune Live : टिळकांचे पुण्यात आगमन म्हणजे संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ठिणगी – शरद पवार
एमपीसी न्यूज – 1865 मध्ये लोकमान्य टिळक (PM Modi Pune Live) यांचे वडील गंगाधर टिळक हे रत्नागिरी येथून पुण्यात आले. त्यांचे पुण्यात आगमन म्हणजे संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ठिणगी होती, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, दीपक टिळक, गीताली टिळक, रोहित टिळक, डॉ. प्रणिती टिळक आदि उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, अनेकांची संस्थाने देशात होऊन गेली. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेलं राज्य त्यांच्या नावाने नाही तर स्वराज्य म्हणून ओळखले गेले. देशाच्या जवानांनी अलीकडच्या काळात सर्जिकल स्ट्राईक केलं. पण देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात केला आहे.
पवार पुढे म्हणाले, 1865 मध्ये लोकमान्य टिळक यांचे वडील गंगाधर टिळक हे (PM Modi Pune Live) रत्नागिरी येथून पुण्यात आले. त्यांचे पुण्यात आगमन म्हणजे संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ठिणगी होती. इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडायचे असेल. तर सामान्य नागरिकांना जागृत केले पाहिजे. त्यासाठी मोठे शस्त्र निर्माण करायला हवे. ते शस्त्र म्हणजे ‘पत्रकारिता’. केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी इंग्रजांवर प्रहार केला.
पत्रकारितेवर कुणाचा दबाव असता कामा नये, पत्रकारिता दबावातून मुक्त असली पाहिजे, ही भूमिका त्यांनी पाळली. 1885 साली महाराष्ट्र कॉंग्रेसचा जन्म पुणे शहरातच झाला. कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्यात होणार होते मात्र प्लेगची साथ आल्याने ते मुंबई येथे झाले.
त्यावेळी दोन प्रकारचे नेते त्या संघटनेत होते. एक जहाल आणि दुसरे मवाळ. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो मी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही भूमिका टिळकांनी घेतली. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून स्वराज्याचे आंदोलन त्यांनी केले. गणेश जयंती, शिवजयंती यामध्ये लोकमान्य टिळकांचे योगदान मोठे होते.
त्या कालखंडात दोन युग होते. एक टिळक युग आणि दुसरे महात्मा गांधी युग. या दोघांचे योगदान आपण कधी विसरू शकत नाही. या व्यक्तिमत्वाचा आदर्श मोठा असल्याने त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आगळा वेगळा ठरत आहे. आजवर हा पुरस्कार अनेक मान्यवरांना दिला गेला. त्यात आज नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश झाला. याचा आनंद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असेही पवार म्हणाले.