Pune News : आढाव दांपत्य आजच्या काळातील सावित्री-ज्योतिबा- डॉ. सदानंद मोरे
एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतिबा फुले यांना समाजसुधारणेच्या कार्यात सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीने साथ दिली, त्याच पद्धतीने बाबा आढाव यांच्या सामाजिक चळवळीत शीला (Pune News) ताईंनी खंबीर साथ दिली. शीलाताई आणि बाबा आढाव या दांपत्याचे कार्य सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्यासारखेच आहे. हे दांपत्य आजच्या काळातील सावित्री-ज्योतिबा आहेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यावेळी महाराष्ट्रातील समता चळवळींचे मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार, सिम्बायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, माजी खासदार संजय काकडे, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, शीलाताई च्या भगिनी माधुरी ठोंबरे, मानसकन्या अनिता भोसले, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, प्रीती बानी आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्रॅव्हिटस फाउंडेशनतर्फे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत डॉ. बाबा आढाव यांची सहचारिणी म्हणून मोलाचे योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका शीलाताई आढाव यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (Pune News) मानपत्र, सन्मानचिन्ह व 1 लाख 51 हजार रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच महात्मा फुले समता प्रतिष्ठानला ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या वतीने एक लाख एक हजार रुपये देणगीचा धनादेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता काळबेरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. प्रसंगी ज्येष्ठ लेखिका व पत्रकार प्रतिमा जोशी यांनी शीलाताईंची प्रकट मुलाखत घेतली.
Pune News : सुरक्षा रक्षकांच्या पगार वाढीसाठी अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
डॉ. बाबा आढाव यांनी पत्नीविषयी हृद्य भावना व्यक्त करताना सांगितले की, शीलाने माझ्या प्रवासात खंबीर साथ दिली. किंबहुना, तिच्या साथीमुळे मला चळवळीत निर्भीडपणे काम उभारता आले.(Pune News) आज तिचा स्वतंत्रपणे सत्कार होतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. हसत खेळत जीवन जगण्याचा आमचा हा प्रवास अशा पुरस्काराने आणखी वृद्धिंगत होत आहे. तिला मिळालेली दाद तिचा उत्साह वाढवणारी आहे.
वसुधा सरदार, डॉ. विद्या येरवडेकर, संजय काकडे, माधुरी ठोंबरे व अनिता भोसले यांनीही आपल्या मनोगतात शीलाताईंबद्दलचा स्नेह उलगडला. उषा काकडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. अरुण खोरे यांनी आभार मानले.