Pune News : नदीच्या पुनरुज्जीवनाद्वारे संस्कृतीचे देखील संवर्धन व्हावे – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – नदी ही संस्कृतीचे द्योतक असते. एक नदी नष्ट होणे म्हणजे एक संस्कृती लयास जाणे असते. संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि पोषण करायचे असल्यास नदीचे पुनरुज्जीवन होणे, गरजेचे आहे असे मत पुणे महानगरपालिकेचे  महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी आज व्यक्त केले.

कोरोना महामारीमुळे खाटपेवाडी या परिसरातील आणि भुकूम गावातील मृत पावलेल्या व्यक्तिंच्या नावाने स्मृती मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर खाटपेवाडी तलावाच्या उजव्या कडेच्या बाजूने वृक्षारोपण-संवर्धनाचा कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होतेे, त्यावेळी महापाैर बोलत होते.

यावेळी संयोजक वीरेंद्र चित्राव, पुणे म.न.पा. नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, भुकूमच्या सरपंच रेखा वाघ, उपसरपंच सचिन आंग्रे, माजी सरपंच नितीन कुडले, अनिल गायकवाड, सुवर्णा भांबूरकर, अर्जून नाटेगावकर नयनीश देशपांडे आदी उपस्थित होते.

नारायण पांडू वाहळे, ज्ञानेश्वर खंडू कुडले, दत्तात्रय हरिभाऊ कुडले, किसन ज्ञानोबा वहाळे, कांताबाई संभाजी अडसूळ, दत्तात्रय परशुराम कुडले, विवेक युवराज भामरे, शरद भरत आंग्रे, जिजाबाई विठ्ठल आंग्रे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज महापाैरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

महापाैर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, आपल्या घरातील निधन झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करुन त्यांची स्मृती जतन करणे हा स्तुत्य उपक्रम असून वृक्षरोपणाचे असे नानाविविध सकारात्मक प्रकल्प राबून आपल्या लोकांच्या आठवणी जागृत ठेवण्याबरोबरच अप्रत्यक्षपणे पर्यावरण संवर्धनालाच आपण हातभार लावत आहोत.

या प्रकल्पाचे प्रमुख संयोजक वीरेंद्र चित्राव त्यांच्या प्रास्ताविकात म्हणाले की, किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकारातून तयार झालेले रामनदी पुनरुज्जीवन अभियान गेली दोन वर्षे सुरु असून याद्वारे दुर्लक्षित अशा रामनदीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या 12 संस्था, 33 महाविद्यालये, 25 शाळा आणि सुमारे 100 तज्ज्ञ आणि किर्लोस्कर कंपन्यांमधील कामगार यांच्या सहयोगाने ही एक चळवळच उभी राहिली आहे. रामनदीला गतवैभव प्राप्त व्हावे तीचा प्रवाह अवितर आणि निर्मल व्हावा यासाठी आम्ही प्रत्यत्न करीत आहोत. आमचा उद्देश नैसर्गिक आणि शाश्वत कृतीचा आहे.

पुणे म.न.पा. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या की, राम नदीच्या उगमस्थानी असलेल्या खाटपेवाडी तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ काढून तलावाचे खोलीकरण केल्यामुळे परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात फायदे झाले आहेत. त्याच प्रमाणे तलावाच्या डाव्या काठाला केलेल्या वृक्षरोपणातील झाडे गेल्या 2 वर्षांत आम्ही उत्तम रित्या जोपासली आहेत.

अनिल गायकवाड म्हणाले की, परिसरातील खेडी, गावे आणि काही शहरीकरणाचा भाग असा हा परिसर आहे. आता पुणे म.न.पा.च्या हद्दीत बरीच गावे समाविष्ट झाल्याने ह्या परिसरातील समाविष्ट झालेल्या भागाचे सांडपाणी नदीत अथवा तलावात न सोडता मुख्य वाहिनीला जोडणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.