Pune : आधुनिक भारतात लोकशाही धोक्यात आहे – शशी थरूर यांचे विधान

एमपीसी न्यूज – “आधुनिक भारत आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेला नाही. आपल्या देशातील या पूर्वीच्या सरकारने कोणाची पूजा करावी,काय खावे, काय घालावे हे कधीही सांगितले नाही. मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारतामुळे जुन्या भारतातील सामाजिक एकोपा, मूल्य आणि इतर चांगल्या गोष्टी नष्ट होत(Pune) आहेत. संविधानातील तरतूदी बदलल्या जात असून देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे”.

 

या देशातील लोकांना ‘मोदींची गॅरंटी’ नव्हे तर ‘लोकशाहीची गॅरंटी’ हवी आहे म्हणून कॉंग्रेसप्रणित सरकारची गरज आहे,अशी टीका काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. शशी थरूर यांनी काल दि.(6 मे) रोजी पुण्यात केली.

 

पुणे लोकसभा मतदारसंघाचे  महाविकास आघाडी, इंडीया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन सोमवारी काँग्रेस भवनमध्ये डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

 

‘ निरोगी, आनंदी, सुरक्षित पुण्यासाठी – माझा शब्द.’ असे जाहीरनाम्याचे वैशिष्ट्यपूर्ण नाव ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी धंगेकर यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, प्रचार प्रमुख मोहन जोशी, अ. भा. काँग्रेस कमिटीचे प्रभारी आशिष दुआ, अभय छाजेड, अंकुश काकडे, गजानन थरकुडे, गोपाळ तिवारी, राज अंबिके आदींसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. थरूर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपप्रणित  सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे जनतेच्या मनात सत्ताधारी भाजपविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार तर सोडाच 300 सुद्धा पार होणार नाही. काँग्रेसने 60 वर्षात जनतेचे काहीही हिसकावून घेतले नाही. अनेक उद्योगांनी त्यांचे मुख्य कार्यालय परदेशातील दुबई सारख्या शहरात हलवले आहे. सरकारी आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जातो. कर चुकवणारे देशभक्त होतात आणि सर्वसामान्य देशद्रोही संबोधले जातात.

पंतप्रधान  मोदींनी 345 वर्षापूर्वीच्या औरंगजेबावर बोलण्यापेक्षा गेल्या 10 वर्षात काय काम केले यावर बोलले पाहिजे. काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये कुठेही मुस्लिम धर्माचा उल्लेख नाही,असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते कोणत्या आधारावर बोलतात हेच कळत नाही. निवडणूक रोख्यांबाबत मोदी सरकार माहिती लपवत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोदी सरकार उघडे पडले. त्यांनी निवडणूक रोख्यांतून स्वतः भ्रष्टाचार करत इतर भाजपप्रणित नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याची टीका डॉ. थरुर यांनी(Pune) केली.

 

पुढे बोलताना थरूर म्हणाले, केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तसेच उत्तर प्रदेशात काँग्रेसला आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा संदेश द्यायचा आहे. रायबरेली लोकसभा 1959 पासून काँग्रेस लढवत आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यामुळे काँग्रेसने ही जागा लढवणे आवश्यक होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी जनतेसोबत असल्याचे दाखवत रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. पंतप्रधान पदाबाबत थरुर म्हणाले, निवडणुकीनंतर इंडीया आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षात एकोपा असून आघाडीच्या जागा महाराष्ट्रात नक्की वाढणार आहेत,असा विश्वासही डॉ. थरुर यांनी व्यक्त केला.

 

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण,सांस्कृतिक आणि पर्यटन, श्रमिक आणि असंघटित कामगार या घटकांचा जाहीरनाम्यात समावेश आहे.

 

शहीद हेमंत  करकरेंच्या मुत्यूची चौकशी झाली पाहिजे

शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालेला नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर थरूर म्हणाले, यामध्ये नेमके तथ्य काय आहे, हे मला माहीत नाही. माजी पोलिस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात तसा उल्लेख आला आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. करकरे आणि माझे चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी झाली पाहिजे. जे काय खरे आहे ते जनतेच्या समोर आले पाहिजे, असेही डॉ. थरूर म्हणाले.

Pune: राहुल गांधी यांच्या सभेने पुण्याचा माहोल काँग्रेसमय –  रवींद्र धंगेकर 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.