Pune : वीजदर कपात केल्यामुळे राज्यात उद्योगधंद्यांना चालना मिळेल ; उर्जामंत्री राऊत यांचा आशावाद

एमपीसी न्यूज –  पुढील पाच वर्षांसाठी राज्यात दरवाढ होण्याऐवजी 7 ते 8 टक्क्याने वीजदर कमी करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने जाहीर केल्याने वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे राज्यात उद्योगधंदे वाढीस चालना मिळेल तसेच  बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास याची मदत होणार असल्याचा आशावाद राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.
वीज दर वाढीचा आलेख नेहमी वाढतच राहिल्याने राज्यात मोठे उद्योग येत नव्हते. दर परवडत नसल्याने राज्यातून उद्योगाचे पलायन जवळच्या राज्यात होत असल्यामुळे राज्याचा विकास मंदावला होता. त्यामुळे वीजदर कमी करण्याचा प्रयत्न यावेळी ऊर्जा विभागाकडून करण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे डॉ राऊत यांनी म्हटले आहे.
आयोगांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर 10 ते 12 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर घरगुती विजदर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार आहेत. आणि शेतीसाठीचे वीज दर 1 टक्क्यांनी कमी होणार आहेत. मुंबईत बेस्ट उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर 8 ते 9 टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
मुंबईत बऱ्याच मोठया भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर 18 ते 20 टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर 19 ते 20 टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
वीज गळती थांबवल्यामुळे ही दर कपात शक्य झाल्याचं ऊर्जामंत्री राऊत यांनी म्हटले आहे. ह्या वीजदरवाढीचा फायदा उद्योगधंदे वाढीसाठी होणार असल्यामुळे उद्योग विश्वातून  समाधान व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.