Cricket Update :विश्वचषक सामन्यात भारताला कमी लेखण्याची घोडचूक पाकिस्तानने केली – वकार युनूस
Pakistan made a mistake in underestimating India in World Cup - Waqar Younis
एमपीसी न्यूज – नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणे मूर्खपणा ठरला. त्या खेळपट्टीवर आधी फलंदाजी घेत मोठ्या धावा उभारून दबदबा निर्माण करण्याची गरज होती. त्या दिवशी पाकच्या गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आले. दुसरीकडे भारताने शानदार कामगिरी केली, असा खुलासा पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक वकार युनूस यांनी केला आहे.
मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर 16 जून 2019 रोजी भारत आणि पाकिस्तान संघामध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना कमी लेखण्याची घोडचूक केल्याने पाकिस्तानला भारताविरुद्धचा हा सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला होता, अशी कबुली वकार युनूस यांनी दिली आहे.
या सामन्यात पाक संघ इकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे 89 धावांनी पराभूत झाला होता.
पाकिस्तान संघाने विश्वचषकात केलेल्या चूकांचा पाढा वाचताना वकार म्हणाले की, ‘पाकला वाटले आधी गोलंदाजी घेत आम्ही भारताला लवकर गुंडाळण्यात यशस्वी होऊ.
मात्र भारताच्या आघाडीच्या फळीने शानदार फलंदाजी केली. नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा पाकचा निर्णय मुर्खपणाचा ठरला. सुरुवातीला खेळपट्टी गोलंदाजांना मदत करेल, असा माझा कयास होता.
भारताचे सलामीवीर लवकर बाद झाले की फलंदाजी कोसळेल, असा अंदाज होता पण तसे घडले नाही, असा निर्वाळा युनूस यांनी दिला आहे.
युनूस पुढे म्हणाले, खेळपट्टी आणि हवामान देखील आमच्या बाजूने नव्हते. भारतीय फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करीत धावांचा डोंगर रचला होता.
रोहित शर्माने 140 धावा करीत भारताला 50 पटकात 5 बाद 336 धावा उभारून दिल्या. त्यानंतर पाकने पावसाचा व्यत्यय येईपर्यंत 40 षटकात 6 बाद 212 अशी मजल मारली होती. पण सामन्यादरम्यान झालेल्या पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता.
पाकिस्तानला दिलेल्या सुधारित धावसंख्येचा पाठलाग करताना पाकीस्तानचा 89 धावांनी पराभव झाला होता.