Maharashtra News : लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाची लाट पुन्हा आली की नाही हे पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या बघता लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मास्क घाला, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या जनतेला केले.

विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर काही दिवसांसाठी बंदी असणार आहे, तसेच, येत्या आठ ते दहा दिवसांत परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल.

तसेच, कारण नसताना उगाच कुणी आपल्याला घरात बंद करून ठेवणं हे कुणालाच आवडणार नाही. पुढील दोन महिन्यात आणखी एक-दोन कंपन्या आपल्याला लस उपलब्ध करून देणार आहेत. लसीकरणाचे कोणतेही साईडइफेक्ट नाही. लवकरच सर्वसामांन्यांना लस मिळणार. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झालं. मास्क हीच आपली कोरोनाच्या लढाईतली ढाल आहे. त्यामुळे लस घेण्या अगोदर व नंतर देखील मास्क घालणं अनिवार्य आहे. शिस्त पाळणं हे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई होणार, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

उद्या रात्रीपासून जिथे योग्य वाटतेय तिथे बंधने घाला, पण जनतेला 24 तासांचा वेळ द्या, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, पालकमंत्र्यांना यावेळी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.