Pimpri News: दोन महिने झाले, सारथीवरील तक्रारींचे टोकन मिळेना!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसाठी वरदान ठरत असलेल्या सारथी हेल्पलाईनवरील तक्रारींचे टोकन मिळणे बंद झाले आहे. तक्रारीसाठी फोन केल्यानंतर एसएमएस द्वारे मिळणारा टोकन नंबर सुमारे दोन महिन्यांपासून येतच नसल्याने तक्रार निकाली निघाली की नाही याची माहिती नागरिकांना समजत नाही. तक्रार ‘ट्रॅक’ करता येत नाही, तक्रारींचे निराकरण होत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा फोन करून टोकन नंबर मिळवावा लागत आहे. टोकन मिळवण्याच्या या किचकट पद्धतीऐवजी एसएमएस द्वारे देण्यात येणाऱ्या टोकन नंबरची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. पण, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

महापालिकेच्या विविध विभागांकडील नागरी सेवा/सुविधांबाबतची माहिती नागरिकांना तत्काळ उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक संगणकीकृत हेल्पलाईन (कॉल सेंटर) ही सुविधा तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2013 रोजी सुरू करण्यात आली आहे.‘सारथी’ हेल्पलाईन दूरध्वनी सेवा 24 तास आठवड्यातील सातही दिवस नागरीकांसाठी उपलब्ध असून त्याद्वारे नागरिकांना आवश्यक असलेली माहिती फोनवरून उपलब्ध होते.

सारथी हेल्पलाईन, सामान्य नागरिकांना त्यांचे दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामध्ये तक्रार केल्यानंतर त्याचे टोकन येणे अतिशय महत्वाचे आहे आणि हे टोकन एसएमएस द्वारे येते.  तक्रार कोणत्या टप्प्यात आहे, ती निकाली निघाली आहे का, याची माहिती टोकनवरून घेता येते. त्यामुळे टोकन मिळणे अतिशय महत्वाचे आहे.

परंतु, मागील दोन महिन्यांपासून एसएमएसद्वारे मिळणारे टोकन मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे तक्रार निकाली निघाली आहे की नाही हे नागरिकांना समजत नाही. त्यामुळे फोनऐवजी एसएमएसद्वारे टोकन देणे तत्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. परंतु, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे, यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना विचारले असता ‘यामध्ये आपण स्वत: लक्ष घालू’ असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.