नाटक ” वन्स मोअर ” मनोरंजनातून अंतर्मुख करणारी नाटयकृती

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- आजकाल लोकसंख्येचा विषय काही ना काही कारणामुळे कधी कधी चर्चेला येतो, लोकसंख्या वाढणे म्हणजे कुटुंबामध्ये मुलांची संख्या वाढणे हे आलेच, पूर्वी ” अष्टपुत्रा सौभाग्यवती भव ” असा आशीर्वाद दिला जायचा, त्यानंतर ” अष्टपुत्रा ” ऐवजी ” इष्टपुत्रा सौभाग्यवती भव ” असा बदल झाला आणि आता ” आम्ही दोघं – आमचे दोन ” असे चौकोनी कुटुंबाची रचना झाली, हे सारे कश्यामुळे तर आर्थिक गणित जमले पाहिजे त्या साठी आता समजा ” एकच मुलं ” आपल्या कुटुंबात हवे असे झाले तर काय होईल ? अश्याच ह्या मध्यवर्ती कल्पनेवर ” वन्स मोअर ” ह्या नाटकाची उभारणी केली आहे. हा विषय अगदी सहजतेने हाताळलेला आहे.

भरत जाधव एंटरटेनमेंट आणि ड्रीम कॅचर प्रकाशित ने ” वन्स मोअर ” ह्या नाटकाचे सादरीकरण केलं आहे. नाटकाचे कथाबीज पार्थ देसाई यांचे असून नाटकांचे मूळ लेखन स्नेहा देसाई यांचे असून त्याचे नाटयरूपांतर आणि दिगदर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केलं आहे. निर्माते मृण्मयी कुलकर्णी, नितीन, शिरीष आणि भरत जाधव हे आहेत. प्रकाश योजना शीतल तळपदे, नेपथ्य संदेश बेंद्रे, संगीत साई-पियुष, वेशभूषा महेश शेरला यांची आहे. यामध्ये भरत जाधव, ऋजुता देशमुख, राजन ताम्हाणे, प्रांजल दामले, उर्मिला झगडे, शीतल कोल्हापुरे, प्रवीण वाळुंजकर, प्रशांत विचारे, समाधान हेगडे ह्या कलाकारांनी भूमिका केलेल्या आहेत.

जीवन देशमुख आणि नियती देशमुख यांचे हे एक सुखी कुटुंब, त्यांना एक लालू नावाचा शाळेत जाणारा मुलगा, त्या शिवाय जीवन चे वडील रामचंद्र आणि जीवन चा भाऊ अद्वैत असे सर्व एकत्रपणे सुखाने रहात असतात. लालूला खेळायला कोणीतरी आणायचा असा विचार जीवन करीत असतानाच सरकारचा एक ” फतवा ” निघतो कि या पुढे विवाहित जोडप्यास एकच मुल जन्माला घालता येईल, आणि त्याना आणखी एक मुल जर झाले तर त्यांना दुप्पट कर द्यावा लागेल, हे घोषणा होते आणि त्याच वेळी नियतीला नवीन मुलाची चाहूल लागायला सुरवात होते. म्हणजे लालूला आणखी एक भावंड येणार, आत्ताच्या मिळणाऱ्या कमाईवर पुढे कसे काय घर चालणार ह्याची चिंता जीवन ला भेडसावते, नियती आणि जीवन ह्यांच्यात वाद होतो, आपण गर्भपात करून घेउया असे जीवन सुचवतो, नियती त्याला मान्यता देत नाही.

अद्वैत हा जीवनचा एकटाच भाऊ, त्याला अभिनयाचे वेड असते, त्यामध्येच करिअर करून पैसे मिळवणार असे तो ठरवतो, त्याचे वय लग्नाचे झालेलं असते पण त्याला लग्न करायचे नसते पण त्याच्यासाठी एक मुलगी सांगून येते आणि पुढे काय काय घडते त्याचा अनुभव नाटकात मिळेल,,,

” एकच मुल ” ह्या सरकारच्या नियमापुढे काहीच चालत नाही, अद्वैत ला मुलगी पसंत पडते का ? नियती आपल्या मुलाला जन्म देते का ? जीवन आणि त्याचे वडील रामचंद्र काय तोडगा काढतात ? ” एकच मुल ” ह्यातून मार्ग कसा काढला जातो ? त्यासाठी ” गुगल ” ची कशी मदत घेतली जाते ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे नाटकात पहा,,

जीवन ची मध्यवर्ती भूमिका भरत जाधव यांनी नेहमीच्या सफाईने केली आहे. ऋजुता देशमुख ने नियतीच्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. रामचंद्र ची भूमिका राजन ताम्हाणे यांनी मनापासून साकारलेली आहे. या शिवाय उर्मिला झगडे, शीतल कोल्हापुरे, प्रणिता वाळुंजकर, प्रशांत विचारे, प्रांजल दामले, समाधान हेगडे यांची उत्तम साथ लाभली आहे. निपुण धर्माधिकारी यांचे दिगदर्शन नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते, मूळ गुजराथी नाटकाचे रूपांतर करताना त्यांनी मनोरंजन कसे अधिक प्रमाणात होईल याकडे लक्ष दिलेलं असल्याने नाटकाची रंजकता वाढलेली जाणवते. नाटकाचे नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, हे सारे एकमेकाला पूरक असे आहे.

” एक मुलाची ” गंभीर समस्या हसत-खेळत मांडण्यात आणि ती उत्तमपणे सादर केली गेली असल्याने नाटक धमाल करून जात असताना प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला लावते….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.