Pune : भाजप नेते संजय काकडे यांचा राज्यपालांवर निशाणा, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने

एमपीसी न्यूज – राज्य मंत्रिमंडळाने 13 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर घेण्याची शिफारस केली आहे. कॅबिनेटने मंजुरी दिली असताना राज्यपाल निर्णय का घेत नाहीत, असा सवाल भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उपस्थित केला आहे.

हा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र कदापिही माफ करणार नाही, अशा शब्दांत भाजपला घरचा आहेर दिला.

कोरोनाचे संकट गंभीर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर केले, अशा शब्दांत काकडे यांनी मुख्यमंत्र्यांचे गुणगान केले. त्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना 6 महिन्यांच्या आत कोणत्या तरी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. अन्यथा काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात येऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर संजयनाना काकडे यांनी व्यक्त केलेले मत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.