Pune Crime News : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, 5 महिन्यांत 103 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे

एमपीसी न्यूज – महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजबिल वसुलीचे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण तसेच कार्यालयांची तोडफोड केल्याप्रकरणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच महिन्यांमध्ये 103 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 65 जणांना तात्काळ अटक देखील करण्यात आली होती.

दरम्यान पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरवड्यात शासकीय कामात अडथळा आणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याच्या 10 घटना घडल्या असून 21 आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर त्यातील 11 जणांना अटक करण्यात आली.

वीजग्राहकांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या गंभीर आर्थिक संकटामुळे थकीत वीजबिलांच्या वसुली मोहीम राबवित आहेत. मात्र थकीत वीजबिलांचा भरणा करण्याऐवजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाच मारहाण, धक्काबुक्कीचे प्रकार होत आहे. याची महावितरणने गंभीर दखल घेतली आहे. सोबतच पोलिस विभागाचे चांगले सहकार्य मिळत आहे. त्यामुळे पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत अशा 40 प्रकरणांमध्ये 103 आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 65 जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.

सरकारी कामात अडथळा आणणे (कलम 353), कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, अपशब्द वापरणे (कलम 504), धमकी देणे (कलम 506), मारहाण करणे (कलम 332 व 333), कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड करणे (कलम 427), सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, कार्यालयात गोंधळ घालणे (कलम 143, 148 व 150), अनधिकृत जमाव गोळा करणे (कलम 141 व 143) आदी प्रकारांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलमांन्वये कारवाईची तरतूद आहे. या विविध कलमांन्वये दोन ते 10 वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.