Pune News : पंतप्रधानांच्या ‘स्मार्ट सिटी’ला सत्ताधारी भाजपाचाच खो : गोपाळ तिवारी
पुणे शहराचे रँकिंग एक हाती सत्ता असलेल्या भाजपाच्या काळात चक्क 28 व्या क्रमांकावर घसरले आहे.
एमपीसी न्यूज – महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशात पहिल्या पाच शहरात द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकविणाऱ्या पुणे शहराचे रँकिंग एक हाती सत्ता असलेल्या भाजपाच्या काळात चक्क 28 व्या क्रमांकावर घसरले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
स्मार्ट सिटी योजनेला महापालिकेतील सत्ताधारी भाजपचाच खो, असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.
या अपयशाची जबाबदारी भाजपाने स्वीकारून स्मार्ट सिटी योजनेच्या त्रुटी दूर करून महापालिका निवडणुकीपूर्वी पुणेकरांना दाखवलेल्या ‘स्मार्ट सिटीच्या स्वप्नांची’ पूर्तता करावी, अशी मागणीही तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पुणे शहराने पहिल्या 3 वर्षात मिळालेल्या 600 कोटी रुपयांचा निधी वेळेत खर्च केला नाही. त्यामुळे पुणे शहराला पुढचा निधी मिळू शकलेला नाही. हे अत्यंत धक्कादायक व लाजीरवाणे आहे.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पुणे शहराने नवीन योजना राबविल्या नाहीत. योग्यप्रकारे अंमलबजावणी केली नाही यामुळे हे मानांकन घसरले आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेतील या अपयशाला सत्ताधारी भाजपच् जबाबदार असल्याच्या आरोप तिवारी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 जून 2016 रोजी देशातील महत्वाकांक्षी 100 स्मार्ट सिटीच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यामध्ये पुणे शहरास प्राधान्य देत शहरातील कस्तुरबा झोपडपट्टी पुनर्विकास, नागरीकांना वितरीत करण्यात येणारे विविध सुविधांचे स्मार्ट कार्ड, लाईट हाऊस इ. 14 योजनांचा शुभारंभ केला होता.
तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांना महतप्रयासाने व्यासपीठावर बसवले गेले ही घटनाच योजना सर्वस्वी केंद्र सरकार अखत्यारीत असल्याचे द्योतक होते.
पुणे महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन याचा जोरदार गाजावाजा करण्यात आला होता. आता स्मार्ट सिटी योजनेमुळे पुणे शहर – फॉरेन सिटी प्रमाणे स्मार्ट बनणार असे स्वप्न देखील दाखविण्यात आले होते.
त्यानुसार पुणेकरांनी भाजपचे 100 हुन अधिक नगरसेवक निवडून देऊन, त्यांना एकहाती सत्ता ही दिली. मात्र, साडे तीन वर्षांनी स्मार्ट सिटी योजनेचा पूर्ण बोजवारा उडालेला दिसत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत औंध-बाणेरमधील चांगले फुटपाथ उखडून पुन्हा दुसरे फुटपाथ बांधण्याशिवाय काहीही केले नाही. औंध-बाणेरचा मॉडेल एरिया विकसित झाल्यानंतर शहरातील इतर भागात स्मार्ट सिटीचे काम होणार होते.
मात्र, अजून मॉडेल एरियाच विकसित झालेला नाही, तर पुढील अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे ही तिवारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.