Talegaon Dabhade : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना दिले स्वसंरक्षणाचे धडे
एमपीसी न्यूज – इंदुरी येथील चैतन्य चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये या प्रजासत्ताक दिन व आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजारोहण झाल्यानंतर मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. स्वसंरक्षणाच्या क्लुप्त्या शिकणे सध्या खूप आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तोलानी शिपिंग कंपनी लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर, तोलानी मेरीटाइम इंस्टिट्यूट गव्हर्निंग कौन्सिल आणि तोलानी एज्युकेशन फाउंडेशन सल्लागार समितीचे सदस्य कुमार राममूर्ती व पार्वती कुमार तसेच जुही अग्रवाल, रजत अग्रवाल ,सुरेश देसाई, महेश पाटील, जगन्नाथ जरग, सतीश चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वारकरी साहित्य परिषद,महाराष्ट्र निर्मल वारी अभियान, हरित वारी अभियानाचे सदस्य हभप शिवाजी सदाशिव मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कमांडो मार्शलचा गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांनी शानदार परेडचे प्रदर्शन केले. त्यानंतर इंडियन आर्मी मराठा रेजिमेंट युथ क्रीडा फाऊंडेशनचे डायरेक्टर निवृत्त आर्मी ऑफिसर रमेश वराडे यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी कमांडो प्रशिक्षण कसे गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच मल्लखांब, नेमबाजी, तलवारबाजी, लाठी काठी याबद्दल प्रात्यक्षिक दाखवण्यात आली.
इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कु विग्नेश सोनवणे याने देशभक्तीपर कविता सादर केली. तसेच इयत्ता पाचवी चा विद्यार्थी कु श्रवण आढाव याने चंद्रशेखर आजाद यांच्यावर एकल नाट्य सादर केले. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी राजपुरे हिने संविधान आणि त्याचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच कुमारी आदिती चौरासिया हिने राष्ट्रीय स्तरावर आयोजित 75 वा आजादी चा अमृत महोत्सव व स्वातंत्र्यसंग्रामाची आठवण भाषणातून करून दिली.
त्यानंतर शाळेच्या सहशिक्षिका सौ.अर्चना आठवले यांनी स्वातंत्र्य बद्दलची भावना आपल्या कवितेतून सादर केली. सतीश चव्हाण यांनी प्रजासत्ताकाचे महत्त्व सांगून स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास व खऱ्या स्वातंत्र्याची ओळख करून दिली. त्यानंतर श्री कुमार यांनी चांगल्या सवयी, परिस्थितीचा स्वीकार करणे, पर्यायी नियोजन तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे. असा मोलाचा संदेश दिला .शाळेचे संचालक भगवान शेवकर नवा शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच कमांडो प्रशिक्षणाचे आयोजन त्याचबरोबर 75 व आजादी महोत्सवाचे औचित्य साधून 75 कुटुंबांनी 75 वृक्षरोपणाचा संकल्प केला.
प्रमुख पाहुणे श्री ह भ प शिवाजी मोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक सणाला वृक्ष लावणे, भावी पिढीच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी पर्यावरणाचा विकास करणे, वृक्षाचे संगोपन करणे याबद्दल मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता खेडकर यांनी विद्यार्थ्यांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
वंदेमातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.