Pune : ताल, सुरांनी नटलेल्या पहिल्या स्वर गंधर्व संगीत महोत्सवावर रसिकांची पसंतीची मोहोर
एमपीसी न्यूज – किराणा घराण्याचे प्रतिनिधीत्व करणारे युवा गायक उस्ताद अर्शद अली खान यांचे बहारदार गायन, सोनिया परचुरे यांची कथक नृत्य प्रस्तुती, पंडित राकेश चौरसिया यांचे रोमांचित करणारे बासरीवादन रसिकांसाठी पर्वणी ठरले तर ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली. युवा आणि ज्येष्ठ अशा नामांकित कलाकारांचा सहभाग, त्यांच्या सादरीकरणाला रसिकांची मिळालेली दात आणि महोत्सवावर उमटविलेली पसंतीची मोहोर हे पहिल्या स्वर गंधर्व महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
समर्थ प्रॉडक्शन प्रस्तूत आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित दोन दिवसीय स्वर गंधर्व महोत्सवाचा रविवारी रात्री समारोप झाला. दुसर्या दिवसाच्या सत्राची सुरुवात युवा गायक उस्तात अर्शद अली खान यांच्या गायनाने झाली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात राग मुलतानीने केली. खणखणीत आवाजातील आलापिला रसिकांनी दाद दिली. ‘लागी लागी रे सावरिया’, ‘गगन मुरलीया’ या रचनांनंतर त्यांनी रसिकांनी केलेल्या विनंतीनंतर ‘बाजे रे मुरली या बाजे’ हे भजन सादर केले. त्यांना प्रशांत पांडव (तबला), उमेश पुरोहित (हार्मोनियम) आणि स्नेहल कोकिळ (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कलाकारांचा सत्कार सुरेश साखवळकर, मनोज देवळेकर यांनी केला. गानस्वरस्वती किशोरी आमोणकर पुरस्कार मिळाल्याबद्दल उस्ताद अर्शद अली खान यांचा सत्कार ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
गायन मैफलीनंतर सोनिया परचुरे यांचे कथक सादरीकरण झाले. सरस्वती वंदनेने त्यांनी नृत्य प्रस्तुतीला सुरुवात केली. ताल, मत्त, थाट, परण त्यांनी सादर केले. रचनांमधील काव्य शोधणे मला गुरूंच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे त्यांनी रसिकांशी संवाद साधताना सांगितले. सूरसाद यांची रचना असलेल्या आणि विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांनी गायलेल्या ‘राधे तेरो..’ या बंदिशीवर त्यांनी नृत्यरचना सादर केली. पदलालित्य, मोहक हावभाव यातून त्यांनी नृत्याचे सौंदर्य अधिक खुलविले. त्यांना श्रेयस गोवित्रीकर (हार्मोनियम), आशय कुलकर्णी (तबला), क्षितीज सक्सेना (बासरी), मंजुश्री पाटील (गायन), हर्षीता मुळे, इशा गाडगीळ (पढंत) यांनी साथसंगत केली. सोनिया परचुरे यांच्यासह सहकलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
स्वर गंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसर्या दिवसातील (दि. 9) सत्राचे उद्घाटन मानस गु्रपचे संजय नरवडे, मनोज देवळेकर, डॉ. विश्वास मेहेंदळे, सुरेश साखवळकर, रवींद्र सातपुते, सचिन चपळगावकर, श्रीकृष्ण अभ्यंकर, राजीव पाटील, आदित्य शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विषद करताना देवळेकर म्हणाले, कलेच्या प्रांतातही विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी यासाठी संस्थेचा प्रयत्न आहे. प्रत्येकाच्या जीवनात संगीत आहे. स्वत:च्या शोधासाठी संगीताचा उपयोग होवू शकतो. महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकाचे जीवन समृद्ध करण्याचा उद्देश आहे. प्रास्ताविकात चपळगावकर म्हणाले, पिंपरी-चिंचवडने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. अभिरूचीसंपन्न नागरिक घडावेत, त्यांचा सांस्कृतिक स्तर उंचावला जावा यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला सहकार्य करणार्या मान्यवरांचा सत्कार संजय नरवडे व डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या हस्ते करण्यात आला. बाबू शेठ, अशोक अग्रवाल यांचा सत्कार उस्तात अर्शद अली खान यांच्या हस्ते करण्यात आला.
सकाळच्या सत्रात एस. ज्ञानमूर्ती सर यांचे मृदंगवादन झाले. आठ तालातील रचना, राग बिलहरीतील रासवेणुसह विविध रचना त्यांनी सादर केल्या. त्यांना संतोशकुमार यांनी साथसंगत केली. संयोगिता पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेल्या विविध रागांवर आधारित भरतनाट्यम रचना रसिकांची दाद मिळवून गेल्या. बालकलाकारांचा सहभाग लक्षवेधी ठरला.