Talegaon : अखेर नगरपरिषद प्रशासनाचा ‘यु टर्न’ ; बंद केलेले मुख्य प्रवेशद्वार केले खुले
'एमपीसीन्यूज'च्या बातमीचा इम्पॅक्ट
एमपीसी न्यूज: तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी तळेगाव दाभाडेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा घेतलेला निर्णय 24 तासांच्या आत रद्दबातल केला आहे. त्यानुसार लिंब फाट्यावरील सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे प्रवेशद्वारातून पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, लिंब फाट्यावरील सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे प्रवेशद्वारातून अत्यावश्यक सेवेसह सर्व वाहनांना ये-जा करता येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी ‘एमपीसीन्यूज’च्या प्रतिनिधी बोलताना दिली.
तळेगाव दाभाडे येथील मुख्य प्रवेशद्वार (लिंबफाटा) येथुन रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे तळेगावात येण्यास व जाण्यास फक्त वडगावफाटा चाकण रस्त्याचा एकमेव पर्याय ठेवण्यात आला होता. तळेगावात वाढलेली घुसखोरी व पुरेसा पोलिस स्टाफ नाही. यामुळेच मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी असा निर्णय तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात काल झालेल्या बैठकीत जाहीर केला.
रेडझोन असलेल्या क्षेत्रातून येण्यास अटकाव व्हावा व कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत काल मंगळवारी (दि 28) निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार लिंब फाट्या जवळील सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे मुख्य प्रवेशद्वार दुतर्फा बंद करण्यात आले होते. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना देखील येथून आत येण्यास आणि बाहेर पडण्यास अटकाव करण्यात आला होता. त्यामुळे आता अशा सर्वांना वडगाव फाट्यावरून 5 किलोमीटरचा द्राविडी प्राणायाम करावा लागणार होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी देखील मुख्याधिकारी यांचा निर्णय अंमलात आणण्याची तयारी दर्शविली होती.
परंतु, तळेगाव दाभाडेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा घेतलेला निर्णय 24 तासांच्या आत आज दुपारी रद्दबातल करण्यात आला आहे. त्यानुसार आता लिंब फाट्यावरील सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे प्रवेशद्वारातून अत्यावश्यक सेवेसह सर्व वाहनांना ये-जा करता येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.
मुख्य रस्ता बंद केल्यानंतर शहरातील प्रतिष्ठित, काही जागरूक नागरिक आणि व्यापारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गर्दी टाळायची असेल तर स्थानिक लॉकडाऊन पुन्हा नको, दुकानदार आणि भाजी, फळ विक्रेते यांच्या वेळा सकाळी 8 ते रात्री 8 अशी ठेवावी, एकेरी मार्गाचा अट्टाहास नको आणि मुख्याधिकारी यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांना अधीन राहूनच स्वतंत्र बुद्धीने निर्णय घ्यावेत, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया जागरूक नागरिकांनी केली व्यक्त केली आहे.