Pune : रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

एमपीसी न्यूज – रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, हवेली तालुका अध्यक्ष सदाशिव पवार पाटील, राज्य उपाध्यक्ष आनंद तांबे, उमेश फडतडे, गोविंद नरवडे, गणेश लव्हाळे, विजय निकम, इस्माईल शेख, अर्जुन देशमुख, प्रकाश ढवळे, गौतम बाग्लाने, कैलास जाधव, सुरज इंदोर, लाला मस्के, काळू उपाध्येय, चेतन माळवदकर, आण्णा सूर्यवंशी, रमेश मचाले आदी उपस्थित होत

जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हडपसर गाडीतळ येथे सहा सीटर रिक्षाचालकांनी बेकायदेशीर थांबा तयार केला आहे. एका रिक्षातून दहा ते पंधरा प्रवासी भरून अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. हडपसर वाहतूक विभागाकडून रिक्षाचालकांकडून हप्ते घेतले जात आहेत. बेकायदेशीर थांबा बंद करावा. तसेच या रिक्षाचालकांवर कारवाई करावी. पिंपरी-चिंचवड येथे आरटीओ कार्यालयात बोगस शाळेचा दाखला आणि बनावट पोलीस पडताळणी पत्र बनवून शासनाची आणि हजारो रिक्षा चालकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करावी.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने रिक्षाचे मुक्त परवाने दिले जात आहेत. यामुळे कंपनी मधील कामगार, सरकारी नोकरदार यांनी रिक्षा परवाने काढून रिक्षा भाड्याने दिल्या आहेत. यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. रिक्षा व्यवसाय संपत आला आहे. रिक्षा चालकांचे घर प्रपंच चालवणे कठीण झाले आहे.

रिक्षाचालकांचे बँक आणि फायनान्स कंपनीचे हप्ते थकले आहेत. हप्ते भरणे देखील कठीण झाले आहे. यात एयु फायनान्स कंपनीच्या वतीने गुंडांमार्फत रिक्षा ओढून नेल्या जात आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून यावर अद्याप कारवाई झालेली नाही. बळजबरीने रिक्षा ओढून नेणा-या फायनान्स कंपनीविरोधात गुन्हे दाखल करावेत.

बाबा कांबळे म्हणाले, “9 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई येथे रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यावीली मुख्यमंत्र्यांनी रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे महाराष्ट्रातील नियोजित बंद मागे घेण्यात आला. मात्र, आता रिक्षाचालकांच्या प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. रिक्षाचालकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचेही कांबळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.