Pune : लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे स्मारक होण्यापेक्षा अध्यासन व्हावे -डॉ. रामचंद्र देखणे

महापालिकेतर्फे शाहीर अंबादास तावरे, रेश्मा परितेकर, सुरेखा पुणेकर यांना लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे स्मारक होण्यापेक्षा अध्यासन व्हावे. हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे मत संत साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. लावणीचे अनेक प्रकार आहेत. पठ्ठे बापूरावांच्या नावाने पुरस्कार देत असताना उपस्थित किती कमी आहे, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा सन 2017 चा लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार शाहीर अंबादास तावरे यांना, 2018 चा रेश्मा परितेकर यांना तर, 2019 चा पुरस्कार सुरेखा पुणेकर यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारर्थींना मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, गुलाबाच्या फुलांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. इतर पुरस्कारर्थींना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.

सोमवारी सकाळी घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेवक अजय खेडेकर उपस्थित होते. दिग्गज व मराठी रंगभूमीची आयुष्यभर सेवा करणाऱ्या कलावंतांचा पुणे महापालिकेतर्फे लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार दिला जातो.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक शहर असून, महापालिका ही गाभारा आहे. त्यातून हा पुरस्कार दिला जात आहे. कलेचं प्रयोजन केवळ मनोरंजन नाही. संथ, पंथ, कवी आले. पठ्ठे बापुरावांच्या लावणी, गणमुळे एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. त्यांनी 2 लाख 40 हजार लावण्या लिहिल्या. कलावंत जातीचे बापुराव होते.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, अनेक मोठी माणसे या शहरात होऊन गेली. सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम महापालिका करीत आहे. कलाकारांचा गौरव करणे महापालिकेचे काम आहे. सुरेखा पुणेकर यांना हा पुरस्कार देताना आनंद होत आहे.

शाहीर अंबादास तावरे म्हणाले, हा पुरस्कार दिल्याने आनंद होत आहे. पठ्ठे बापुरावांनी असंख्य लावण्या लिहिल्या. तसेच गणही लिहिले. 50 शाहीर आज ही परंपरा मोठ्या दिमाखात पुढे नेत आहेत. ही परंपरा दिग्गजांची आहे. ज्यांना हा पुरस्कार मिळाला, त्यांनी नवीन कलाकार घडविण्यासाठी प्रयत्न करावे.

रेश्मा परितेकर म्हणाल्या, आम्हाला बोलण्याची जास्त सवय नाही. आम्हाला कलेतून जास्त बोलता येते. पठ्ठे बापुराव कसब्यात राहत होते. त्यांच्या नावाने पाठी लावण्यात यावी. त्यांनी केवळ नुसत्या शृंगारीक लावण्या लिहिल्या नाहीत. सावित्रीबाई प्रमाणेच पवळासुद्धाही येथेही जगल्या.

सुरेखा पुणेकर म्हणाल्या, दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार दिल्याचा आनंद होत आहे. पठ्ठे बापुराव आणि पवळा यांना बघण्यासाठी रसिक मुंबईत तिकीट लावून जायची. त्यांच्या नावाने पुण्यात कुठे तरी पाटी लागावी. अनेक जुन्या कलावंतांनी पठ्ठे बापुरावांची लेखणी पोहोचवली. भामाबाई पंढरपूरकर यांना हा पुरस्कार देण्यात यावा. माझे भरपूर सत्कार झाले, पण माझ्या घरच्यांनी आज मला मान दिला, तो महत्वाचा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.