Pimpri: ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के असणा-या 15 जणांचा प्रवास
उस्मानाबाद येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरीला जात होते, वडगाव पोलिसांनी आणला प्रकार उघडकीस
एमपीसी न्यूज – होम क्वारंटाईन सांगितलेले 15 नागरिक एकाच वाहनातून प्रवास करताना आढळले आहेत. उस्मानाबाद येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरीला चालले होते. हा धक्कादायक प्रकार वडगाव मावळ पोलिसांनी बुधवारी उघडकीस आणला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना उपाययोजना कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करत चालक आणि त्या कुटुंबियास निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे.
या नागरिकांना हातावर शिक्के मारुन होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असताना हे कुटुंब एकाच वाहनातून प्रवास करताना बुधवारी आढळून आले. उस्मानाबाद येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरीला जात होते. 22 मार्च रोजी जनता कर्फ्युच्या रात्री एका पाहुण्याच्या अंत्यविधीला हे कुटुंब उस्मानाबाद जिल्ह्यात गेले होते.
त्यानंतर महाराष्ट्र लॉकडाऊन आणि नंतर देश 21 दिवस म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे या कुटुंबाच्या हातावर शिक्के मारून होम कॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र होम कॉरंटाईन पूर्ण होण्याआधी तसेच आहे तिथेच थांबण्याचे आदेश असताना सुद्धा हे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना जात होते.
त्यांचा मंगळवारी रात्री 8 वाजता प्रवास सुरु झाला. परंतु, वडगाव मावळ पोलिसांनी बुधवारी सकाळी 9 वाजता त्यांना नाकाबंदीत अडवल्यानंतर हा धक्कादाय प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना उपाययोजना कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. चालक आणि त्या कुटुंबियास निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे.